Ramakrishna Vetal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Politic's : हकालपट्टी केलेल्या नेत्याची भाजपत पुन्हा दिमाखात एन्ट्री : थेट रवींद्र चव्हाणांच्या टीममध्ये स्थान; काय आहे पडद्यामागचे राजकारण?

Ramakrishna Vetal : आठ महिन्यांनंतर भाजप राज्य कार्यकारिणी जाहीर. कराडचे रामकृष्ण वेताळ किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष. अलीकडील हकालपट्टीनंतर नियुक्तीमुळे साताऱ्यात सत्तासमीकरण, संघटनात्मक रणनीती आणि भाजपच्या राजकीय हालचालींवर चर्चांना उधाण.

Vijaykumar Dudhale

Satara, 24 February : भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जाहीर केली आहे. नव्या-जुन्यांचा मेळ घालत चव्हाण यांनी तब्बल ४३ जणांची आपली टीम घोषित केली आहे. त्या राज्यस्तरीय टीममध्ये सातारा जिल्ह्यातील कराडचे रामकृष्ण वेताळ यांच्यावर भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत वेताळ यांची महिनाभरापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या निवडीमागे सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 12 उपाध्यक्ष, 06 सरचिटणीस, 12 चिटणीस, कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, मुख्यालय प्रभारी आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश असलेली राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील रामकृष्ण वेताळ (Ramakrishna Vetal ) यांच्यावर भाजपच्या किसान आघाडीची सूत्रे देण्यात आली आहेत.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोपर्डे हवेली गटातून रामकृष्ण वेताळ यांंनी भाजपकडे पत्नी विद्या वेताळ यांच्या उमेदवारी मागणी केली होती. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती, त्यामुळे विद्या वेताळ यांनी अपक्ष अर्ज भरला होता. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून रामकृष्ण वेताळ यांची भाजपमधून महिनाभरापूर्वी हकालपट्टी केली होती.

दरम्यान, कोपर्डे हवेली गटात विद्या वेताळ यांच्यापुढे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवरांचे चॅलेंज होते. मात्र, रामकृष्ण वेताळ यांचा संपर्क आणि राजकीय रणनीतीमुळे विद्या वेताळ ह्या निवडून आल्या. अपक्ष निवडून येणाऱ्या वेताळ ह्या सातारा जिल्ह्यातील एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे पक्षाने वेताळ यांची पक्षातून पाच वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. मात्र, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनमत असे मिळाले आहे की भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी सहा जागांची गरज आहे. भाजपकडे २७ जागा आहेत. बहुमतासाठी एक एक जागा महत्वाची आहे, त्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या वेताळ यांना त्यादृष्टीनेच राज्याच्या टीममध्ये घेण्यात आले असण्याची शक्यता आहे.

विद्या वेताळ यांच्या कोपर्डे हवेली गटातील विजयानंतर रामकृष्ण वेताळ यांच्या समर्थकांमध्ये भाजपकडून अन्याय झाल्याची भावना हेाती. त्यामुळे रामकृष्ण वेताळ कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ते शिवसेना किंवा अन्य पक्षांसोबत जाणार का, असाही सवाल उपस्थित होत होता. मात्र, त्यापूर्वीच भाजपने वेताळ यांना थेट राज्य पातळीवरील पद देऊन एक मत निश्चित केल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT