Rohit Pawar, Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar in Koregaon : रडीच्या डावाने शिंदे खचणार नाहीत, पुन्हा लढतील; रोहित पवारांना विश्वास

Umesh Bambare-Patil

Koregaon News : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी पहिल्यापासून चांगला प्रतिसाद दिला. तसेच शशिकांत शिंदेंनी चांगला लढा दिला. पण, मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला आहे. त्यामुळे या पराभवाने शशिकांत शिंदे खचणार नाहीत. एकसारखे दिसणारे चिन्ह पाहून लोक त्याला मतदान करतात, असा रडीचा डाव व रणनिती एकदाच चालू शकते. विधानसभेला हे चालणार नाही. येत्या काळात हा जिल्हा पुन्हा एकदा पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिल आणि आपल्या विचारांचे आमदार निवडून येतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांना राहावलं नाही. त्यामुळे त्यांनी आज कराड दौऱ्यावर असताना रायगडकडे जाताना कोरेगावमध्ये जाऊन शशिकांत शिंदेंची भेट घेतली. तसेच पराभवांच्या कारणे जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, लोकांनी पहिल्यापासून चांगला प्रतिसाद दिला. तसेच शशिकांत शिंदेंनी चांगला लढा दिला. शरद पवारांप्रति त्यांची निष्ठा, प्रेम, पुरोगामी विचारांवरील श्रध्दा या सगळ्याबाबी मलाही आवडतात. या गोष्टींचा मी आदर करतो. मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा थोडक्यात पराभव झाला आहे.

हे मतदारांचे ‘क्रेडीट’

बारमतीतील वाढलेल्या मताधिक्यवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, गेल्यावेळेपेक्षा सर्वात जास्त मताधिक्य बारामतीत मिळाले आहे. एखादा नेता माझ्याशिवाय लीड मिळू शकत नाही, असे म्हणतो. पण येथे नेत्याबरोबरच विचारही महत्वाचा असतो. मताधिक्य नेता देत नाही मतदार देतात. सुप्रियाताईंना मिळालेले मताधिक्य हे मतदारांचे ‘क्रेडीट’ आहे. तसेच त्यांनी केलेली कामे व शरद पवार साहेबांचा संपर्क आणि केलेल्या कामाला मतदारांचा पाठींबा मिळाला आहे.

दोनशे जागांवर विजयाचा प्रयत्न..

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय यावर रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायची आहे. महाविकासचे हे नाते अधिक घट्ट करायचे आहे. कमीत कमी दोनशे जागांवर उमेदवार निवडून आले पाहिजेत. तसेच सत्ताही आपलीच आली पाहिजे. जनतेच्या हितासाठी काहीतरी करता यावे हा यातून प्रयत्न असेल. सातारा जिल्ह्यात वेगळे लक्ष देऊन आपल्या विचारांच्या उमदेवारांना ताकत दिली जाईल. जेणे करुन सत्ता आल्यावर महाराष्ट्र व जिल्ह्याचा विकास होईल.

तर वेगळी समीकरणे...

एनडीएच्या आजच्या बैठकीवर भाष्य करताना ते म्हणाले, आजच्या बैठकीसाठी जे नेते दिल्लीला जात होते, ते आतातरी आपण इंडिया आघाडीसोबत आहोत असे बोलले आहेत. ते असे का बोलले हे बघावे लागेल. त्यांनी योग्य भूमिका घेतली तसेच देशाच्या हिताची भूमिका घेतली तर, वेगळे समीकरण आपल्याला बघायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संघटना कमी पडली...

बुथ कमिटीबाबत काय निर्णय घेणार, यावर रोहित पवार म्हणाले, जिल्हा, तालुका व पक्ष प्रमुखांनी जिल्ह्यात लक्ष देणे गरजेचे आहे. आपली संघटना कुठं कमी पडली याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. हक्काच्या ठिकाणी कमी मतदान मिळाले. तुतारी चिन्ह व दुसरे तुतारीसारखे दिसणाऱ्या चिन्हामुळे 40 हजाराचे मतदान इतर उमेदवाराला गेले.

मुळात संघटनेच्या माध्यमातून आपले चिन्ह आपण मतदारांपर्यंत घेऊन जाऊ शकलो नाही, कुठतरी संघटना कमी पडली आहे. सारखे दिसणारे चिन्ह पाहून लोक त्याला मतदान करतात, असा रडीचा डाव व रणनिती एकदाच चालू शकते. विधानभेला हे चालणार नाही. येत्या काळात हा जिल्हा परत पुन्हा एकदा पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहतील आणि आपल्या विचारांचे आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT