Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांनी केंद्र सरकारला दिला इशारा : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात भाजप व महाविकास आघाडीत विविध घटनांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीकेची तोफ डागली. ( Rohit Pawar warns Central Government: He said ... )

भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या जखमे संदर्भात त्यांनी म्हंटले आहे की, “छोटे व्यापारी, शेतकरी, कामगार काम करताना अनेकदा जखमी होतात. त्यामुळे चार-आठ दिवस मलमपट्टी किंवा कापडाने जखम दुखत असली तरी त्यांना त्याच पद्धतीने काम करावे लागते. पण अशी जखम रातोरात बरी करण्याचे औषध भाजप नेत्यांकडे आहे आणि त्यांनी ते जनहितार्थ जाहीर करावे".

उद्धव ठाकरे दोषारोप करत जबाबदारी झटकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते. या टीकेला आमदार रोहित पवार यांनी रोखठोक उत्तर दिले. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले, की “राज्याच्या हिताच्या गोष्टी बोलण्याची वेळ येते तेव्हा काही न बोलणारे विरोधी पक्षनेते फडणवीस लगेच राज्य सरकारवर टीका करायला आतुर झालेलेच असतात. राज्य शासनावर टीका करण्याआधी त्यांनी आपल्या कार्यकाळातील पेट्रोल – डिझेलवरील कर रचना बघायला हवी” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

“आपण सत्तेत असताना पेट्रोल-डिझेलवर जो VAT आकाराला जात होता तोच 25 टक्के – 21टक्के स्लॅब आज आकारला जात आहे. राज्य सरकार आकारत असलेल्या सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या कार्यकाळात आकारल्या जात असलेल्या सेसपेक्षा आज आकारला जात असलेला सेस नक्कीच कमी आहे.”

इतकेच नव्हे तर, “डिझेलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज डिझेलवर केंद्राचा कर 22 रुपये आहे तर राज्याचा कर 20 रुपये आहे. त्यामुळं डिझेल दरवाढी संदर्भात राज्याचा प्रश्नच येत नाही. पेट्रोलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्राचा कर 28 रुपये आणि राज्याचा कर 32 रुपये आहे. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी राज्य सरकारला कारणीभूत ठरवणे पूर्णतः चुकीचे असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

“युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत जास्त असताना पेट्रोलची किंमत कमी असायची आणि आज भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत कमी असताना पेट्रोलची किंमत मात्र जास्त आहे, हे विपरीतच नाही का? परंतु यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही, कारण… ‘भाजप है तो मुनकीन है.'” असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

“केंद्र राज्याला मदत देताना सापत्न वागणूक देत असल्याची मुख्यमंत्र्यांची तक्रार योग्यच आहे. तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारील गुजरात राज्याची पाहणी करून तत्काळ एक हजार कोटीची मदत दिली आणि आपल्या महाराष्ट्राला मात्र एक रुपयाही दिला नाही. याचं महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून नक्कीच प्रत्येकाला दुःख आहे. भाजप नेत्यांना कदाचित महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबद्दल वाईट वाटले नसावं, नाहीतर त्यांनी नक्कीच राज्याची बाजू मांडली असती.” असे केंद्र सरकारच्या धोरणा बाबत त्यांनी सांगितले.

“देशात असलेल्या महागाईला केंद्र सरकार कारणीभूत असताना राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून देशाची परिस्थिती सुधारणार नाही. महागाईवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी किमान महागाई आहे हे तरी केंद्र सरकारने मान्य करावं तरच त्यावर उपाय शोधता येईल. अन्यथा नाही-नाही म्हणत जखम लपवून कधी सेप्टिक होऊन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवेल हे कळणारही नाही, याचं भान केंद्रीय नेतृत्वाने ठेवायला हवं” अशा शब्दात रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT