Rohit Pawar News, Gopichand Padalkar News in Marathi, Maharashtra Political News
Rohit Pawar News, Gopichand Padalkar News in Marathi, Maharashtra Political News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 297 व्या जयंतीच्या दिवशी उत्सव झाल्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांची सभा झाली. या सभेत त्यांनी, 'भाड्याने आणलेले लोक गेले. ज्यांना आमची भीती होती ते पळून गेले', असा आरोप केला. या आरोपाला आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सडेतोड उत्तर देत सांगितले की, जयंतीत आलेले अहिल्याभक्त हे भाड्याने आलेले होते असे त्यांना वाटते का? पुढच्या वेळी यापेक्षाही मोठी जयंती होणार, असे त्यांनी स्पष्ट केले. ( Rohit Pawar's reply to Padalkar: He said ... )

रोहित पवार म्हणाले, या ठिकाणी सुमारे 30 हजार लोक होते. सर्व धनगर समाजाचे होते. त्यात 50 टक्के महिला होत्या. त्यांचे असे म्हणणे आहे का की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सामूहिक पद्धतीने साजरी करण्यासाठी आले होते. ते सर्व भाडेकरू होते का? (Rohit Pawar News in Marathi)

ते पुढे म्हणाले की, त्यांचा आक्षेप त्यांच्याच समाजावर आहे. ही आश्चर्याची गोष्ट आहे. हे कळत नसेल. भाषण करण्यासाठी समाजाचेच नाव खराब करत असतील ते कितपत योग्य आहे. चौंडीत आलेली प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या भावनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार ज्यांनी आत्मसाद केला आहे. हा विचार जो पुढे घेऊन चालले आहेत. असे लोक चौंडीतील उत्सवात आले होते. कार्यक्रम संपल्यावर ते आपापल्या घरी गेले. माझे असे म्हणणे आहे, की बाहेर कुठल्यातरी गेटवर उभे राहून बोलत असताना कार्यक्रम संपल्यावर आयते लोक मिळाले यात खूश रहा, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

शरद पवार या पूर्वी चौंडीतील जयंती उत्सवात का आले नाही असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला होता. यावर रोहित पवार यांनी सांगितले की, शरद पवार यापूर्वी चौंडीत येऊन गेले आहेत. त्यांच्या विचाराने चालणाऱ्या राज्य सरकारनेच चौंडीतील स्मारकासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना व छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांनी मिळून येथे भरीव निधी त्या काळात दिला होता. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने कोणताही निधी दिला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निधी मंजूर झाला आहे. भाजपचे सरकार आल्यावर निधी द्यायच्या वेळी शांत बसता आणि सत्ता जाताच बोलू लागतात, असा आरोपही आमदार पवार यांनी केला.

चौंडीत चांगली वास्तू उभी रहावी यासाठी काम करणाऱ्या लोकांची सत्ता येते. आम्ही निधी आणून कार्यकार्यक्रम करत असू तर तुम्हाला काय अडचण आहे. तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळी तुम्ही काय केले? साधा रस्ताही करू शकला नाहीत. या ठिकाणी येऊन भाषण करता हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राम शिंदेच्या सभेवर पडळकरांची दगडफेक

कार्यक्रमाला परवानग्या देताना त्याला काही नियम, प्रोटोकॉल असतो. ज्यावेळी विचारले कुठे कार्यक्रम करायचा, जागा ठरली आहे का? चौंडीचे सरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य त्यांच्या बरोबर जागा दाखवत फिरले. मात्र ते नको म्हणायचे. कारण त्यांच्यामागे लोकच येणार नव्हते. त्यांना सभा यासाठी पाहिजे होती की ही 30 हजार लोकांची सभा बंद पडावी. 2018ला राम शिंदे यांनी सभा घेतली होती. पडळकर यांनीच पुढाकार घेऊन दगडफेक केली होती, असे लोक सांगतात. त्यामुळे 18 युवक अडचणीत आले. मागील चार दिवसांत पाहिले तर सातत्याने दगडफेक, दंगल असेच ते म्हणतात. सामान्य लोक येत असताना दगडफेक व दंगल असे म्हणत असताल तर पोलिस थांबविणारच. महिलांच्या हितासाठी त्यांना सांगितले की दुपारी तीन नंतर तुमची सभा आहे. त्यांनी सभा उधळून लावली असे त्यांना वाटत असेल तर ते वेगळ्या भ्रमात आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

पुढच्या वेळी आणखी मोठी सभा घेऊ

चौंडीत आम्ही जयंती सामुहिक पद्धतीने साजरी केली होती. यात ग्रामपंचायत, कर्जत-जामखेडचे सर्व नागरिक तसेच राज्यातील एक हजार लोक धनगर समाजाचे बोलावले होते. ही जयंती सामुहिक पद्धतीने कुठलेही राजकारण न आणता साजरी करण्यात आली. यावेळी कुठलेही राजकीय भाषण, पक्षाचे चिन्ह नव्हते. अशाच पद्धतीने महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायला हव्यात. समाजबांधवांनी पुढच्या वेळी यापेक्षा तीन ते चार पट मोठी सभा घ्यावी असे ठरविले आहे. मग हे कोण अडविणारे? त्यावेळी टीव्हीवर दिसण्यासाठी काहीतरी लॉलिपॉप घेऊन ते येतील. पुढच्यावेळी आम्ही यापेक्षाही मोठी सभा घेणार आहोत, असा टोलाही त्यांनी पडळकर यांना लगावला.

जयंतीत पडळकरांचा गजर

पडळकर हे स्वतः कलाकार आहेत. त्यांना ओव्हर अॅक्टिंग जमते. राजकारणात अॅक्टिंग चालत नाही. त्यांनी चार दिवसांत अॅक्टिंग व ओव्हर अॅक्टिंग केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असताना त्यांचे कार्यकर्ते काय गुणगाण गात होते. त्यांचे कार्यकर्ते एक छंद गोपीचंद म्हणत होते. जयंतीत आल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा गजर गायला पाहिजे तिथे पडळकरांचा गजर होतो. त्यांची रॅली काढली जाते. आम्ही अहिल्यादेवीच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो. अहिल्यादेवींवर हेलिकॉप्टरमधून फुले टाकली. आज त्यांच्या विचाराला महत्त्व आहे. असे असताना पडळकरांना महत्त्व देण्यात आले. हे कितपत योग्य आहे यातूनच त्यांची विचारसरणी समजते, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचा थर्ड ग्रेड पिच्चर

पवार कुटुंबावर बोलण्यासाठी कदाचित त्यांना ठेवले असावे. एक भारी पिच्चर बनविणारे असतात, एक मध्यम पिच्चर बनविणारे असतात. प्रेमाचा पिच्चर, अॅक्शन पिच्चर आणि थर्ड ग्रेड पिच्चर असतो. थर्ड ग्रेडमध्ये काहीही चालते त्यात काही अर्थ नसतो. त्यावर काहीही बोला. राजकारणात असे खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे आमदार, कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यासाठीच ठेवले आहे. कारण त्यांचे वरचे नेते त्यांना थांबवत नाहीत. त्यांना नेमलेले काम ते करतात. त्यामुळे ते शरद पवार व त्यांच्या कुटुंबियां विरोधात बोलतच राहतात. या जयंतीत केवळ आमदार मी आहे. मात्र कार्यकर्ते व समाजबांधव हे जुनेच आहेत. फरक काय दिसला तो पहा. त्यांची नेमणूक त्यासाठीच, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT