Sharad Pawar, Sadabhau Khot
Sharad Pawar, Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा कळले नाही!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापुरातील युवा सेनेच्या मेळाव्यात सोमवारी भूम-परंड्याचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (Ncp) टीका केली होती. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे.

खोत म्हणाले, यंदाच्या अर्थशंकल्पातील 60% निधी राष्ट्रवादी, 30% निधी काँग्रेस आणि 15% निधी हा शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे पवारांच्या जवळ गेले, पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत खोत यांनी शिवसेनेला चिमटा काढला. "तानाजी सावंत यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर केलेली टीका म्हणजे त्यांच्या मनातील खदखद आहे, असेही खोत म्हणाले.

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाचा लोकार्पण सोहळा 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यावरुन सांगलीत चांगलेच राजकारण तापले होते. भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत उद्घाटन केल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. गरीब समाजातील एखादा पोरगा आमदार होतो. तो आपल्या समाज बांधवांसाठी लढतो. मेंढपाळांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करतो. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी संपूर्ण ताकद वापते हे योग्य नाही. पवार साहेब महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. त्यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे कार्य केले. त्यामुळे शरद पवारांचे आडनाव बदलून 'आगलावे' करावे. हे राज्य पूर्णपणे होरपळून निघाले आहे. ते आता कुठेतरी थांबले पाहिजे, असेही खोत म्हणाले.

त्याच बरोबर खोत यांनी यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावरही निशाणा साधला. जाधव यांच्यावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. त्यामध्ये जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला पैसे दिल्याची नोंद असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर खोत म्हणाले, आईला काही उपहार दिले असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात त्यामुळे आईला काही दिले तर ते डायरीत कोणी लिहून ठेवत नाही. मात्र, आई वसुलदार असेल तर ते लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले लिहून ठेवले जातात. आई ही वसुली अधिकारी नसते. मात्र जिथे वसुली होते तिथे लिहून ठेवले जाते, असेही खोत म्हणाले.

त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची वीज कापायला कोणी येत असेल तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता दांडके असतील. त्याने सोलून काढले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आता शेतकऱ्यांना 'वीजबिल माफी'च द्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT