Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijeet Patil, Samadha Avtade, Baban Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalwedha-Pandharpur Assemly : मंगळवेढ्यातील २७ ग्रामपंचायती ठरवणार आमदार; अवताडे, भालकेंसह इच्छुकांची धावपळ

हुकूम मुलाणी

Solapur Political News : विधानसभा निवडणुकीला सुमारे ११ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, तर लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली. यातच ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. गावागावांत ताकद असेल, तर विधानसभेची निवडणूक सोप जाईल, हे गणित साधण्यासाठी अनेक इच्छुकांना ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष द्यावे लागणार आहे. याच धर्तीवर मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मातब्बर नेते उतरणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

सध्या राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामुळे अनेक प्रस्थापितांची घालमेल सुरू आहे. आंदोलनाचे उठलेले वादळ व शेतकरी प्रश्न पाहता संभाव्य या मतदारसंघातून पुन्हा आमदार होण्यासाठी अनेकांनी आपले गुडघ्याला बाशिंग बांधल्याचेही दिसून येत आहे. मात्र, आमदारकीची माळ गळ्यात पडण्यापूर्वी गाव पातळीवरील आपला गट मजबूत असणे आवश्यक आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच भावी आमदारांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया कमी दिवसांत पूर्ण होणार असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांनाही गाव पातळीवर बस्तान मजबूत करण्यासाठी त्यांना आर्थिक रसद पुरवावी लागणार असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Political News)

भाजप आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा आमदार होण्यासाठी आपला गट मजबूत ठेवावा लागणार आहे. 'बीआरएस'चे भगीरथ भालके यांच्याकडे सध्या कोणतेही राजकीय सत्तास्थान नाही. ते फक्त स्व. भारत भालके यांचे राजकीय वलयाबरोबर आपला गट मजबूत करण्यावर भर देतील. विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यांनी आपले राजकीय बस्तान मंगळवेढ्यात बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतेच दामाजी कारखान्यात समविचारीच्या आघाडीच्या माध्यमातून यश मिळवले, त्यांना शिवानंद पाटील यांच्या माध्यमातूनच ग्रामपंचायत निवडणुकीत शिरकाव करावा लागणार आहे. बबनराव अवताडे यांचा गटही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य चार उमेदवारांच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे त्यांना गाव पातळीवरील उमेदवारांना ताकद द्यावी लागणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर या निवडणुका होणार असल्यामुळे मतदारांची इच्छापूर्ती करताना सर्वच नेत्यांचा कस लागणार आहे. त्यासाठी गाव पातळीवरील उमेदवारांनाही वरिष्ठ नेत्यांजवळ आपले वजन दाखवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमधील मतदारांची दिवाळी यंदा जोरात होणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीनंतर लोकसभेच्या रणसंग्रामाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपापल्या राजकीय वरिष्ठ राजकीय नेत्याजवळही आपले बस्तान मजबूत असल्याचे दाखवण्यासाठी भावी आमदारांना कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्या तरी यात स्थानिकासह वरिष्ठ नेत्यांनाही हस्तक्षेप करावा लागणार आहे. गावागावांत आपापले गट सत्तेत आणण्यासाठी मंगळवेढ्यातील चारही नेत्यांनी हलचाली सुरू केल्या आहेत. परिणामी यंदाची कुठलीही निवडणूक आपापल्या पातळीवर राहणार नाही, हेच यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे यंदा लोकसभा, विधानसभा जिंकण्यासाठी ग्रामपंचायतीत मातब्बर नेते दिसले नाही, तर नवल म्हणावे लागेल. दरम्यान, बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील नेते एकमेकांच्या विरोधात असतील, पण गावगाड्यात मात्र कोण कोणाशी हात घालतात, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT