Deepak Salunkhe -Sadabhau Khot
Deepak Salunkhe -Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘सांगोल्यातील प्रकार म्हणजे राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंनी रचलेले कटकारस्थान’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः सांगोल्यातील घटना हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार दीपक साळुंखे यांनी रचलेले कटकारस्थान आहे. पण मीही कच्च्या गुरुचा चेला नाही. तुमच्यात दम असेल तर तुम्ही कुठल्या मैदानात यायचे तेवढं सांगा, त्यासाठी मी तयार आहे, असे आव्हान आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि साळुंखे यांना दिले. (Sangola's incident is a conspiracy hatched by Deepak Salunkhe : Sadabhau Khot)

पंचायत राज समितीच्या माध्यमातून सांगोल्याचा दौऱ्यावर आलेले सदाभाऊ खोत यांना अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने अडवून ‘अगोदर माझे पैसे द्या; मगच पुढच्या दौऱ्यावर जावा’ असे म्हणून थकीत बिलासाठी हुज्जत घातली होती. त्यानंतर खोत यांनी या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि टोमॅटोसारखे गाल असलेल्या नेत्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्या नेत्याचे नावच आजच्या पत्रकार परिषदेत खोत यांनी घेतले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीच हे कटकारस्थान रचले आहे. मी मुंबईमध्ये होतो. मला त्याबाबत काही माहिती नाही, असे सांगून ते आता साजूकपणाचा आव आणत आहेत. पण, लोकं तिहार कारागृहात बसून काम करतात. तुम्ही मुंबईत म्हणजे काय पाकिस्तानमध्ये होता का ? असा प्रश्नही खोत यांनी या वेळी उपस्थित केला.

सांगोल्यातील घटनेमागचा सूत्रधार कोण आहे, हे शोधले पाहिजे. माझ्याविषयी राष्ट्रवादीच्या मनात सूडाची भावना आहे. हा सूड कसा उगवायचा, याचे प्लॅनिंग राष्ट्रवादीकडून केले जात आहे. सांगोल्यातील प्लॅनिंग वेगळ्या प्रकारचे होते. माझी गाडी अडवली असती, माझ्यावर हल्ला झाला असता किंवा माझी गाडी फोडली असती आणि माझ्या जीवाला धोका झाला असता तर हे म्हणाले असते की हॉटेलवाल्याचे बिल थकल्याने त्याच्या माणसाने हल्ला केला. मात्र, राष्ट्रवादीच्या लोकांनी कुठल्या मैदानात यायचे ते सांगावं. आम्हीही काही कच्चा गुरुचा चेला नाही, असे उघड आव्हान खोतांनी राष्ट्रवादीला दिले.

ते म्हणाले की, गेली दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया राज्यात दुसरा प्रश्न राहिला नाही, त्याप्रमाणे सदाभाऊंनी हॉटेलचे बिल बुडावलं म्हणून सगळे माझ्यावर अंगावर आले होते. मात्र, मला काय भांडाभोड करायचा होता तो मी केला आहे. मी मातीतला माणूस आहे. केव्हा ढाक मारायची, हे मला चांगलं कळंतं. मी फाटका असून माझं काही नाही. पण, तुमचं गाठोडं मोठं आहे. माझं काहीच नुकसान होणार नाही. पण तुमची वाट लावल्याशिवाय मी राहणार नाही. आम्ही आमदारकी आणि खासदारकीसाठी राजकारणात आलेलो नाही, हे लक्षात ठेवावे.

दीपक साळुंंखेंचा बोलविता धनी कोण आहे, या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारुंची टोळी आहे. त्या ठिकाणी सामान्य माणसाचं फक्त नाव घेतलं जातं. पण, सगळं लुटीचं काम होतं. साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बॅंका कोणाच्या ताब्यात आहेत. त्या कोणी बंद पाडल्या. सांगोल्याचा साखर कारखाना मातीमोल किमतीने चालवायला दिला. लाखो शेतकऱ्यांचं नुकसान यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT