Sanjivanidevi Gaikwad Death Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjivanidevi Gaikwad Death: EVM वर निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचं निधन

First woman MLA elected by EVM Sanjivanidevi Gaikwad Death: राज्यात मतदान यंत्रावर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या महिला आमदार म्हणून कै.संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांच्या नावाची नोंद झाली आहे

Rahul Gadkar

Kolhapur News: शाहूवाडीच्या माजी आमदार व गोकुळच्या संचालिका संजीवनी देवी गायकवाड (वय ७१) यांचे आज सकाळी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे महिनाभरापासून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आज उपचार सुरू असताना सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागाळा पार्क येते त्यांचे वास्तव्य होते. पंचगंगा घाटावरील जुन्या वाड्यात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथे काही काळ थांबून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

राज्यात मतदान यंत्रावर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या महिला आमदार म्हणून कै.संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांच्या नावाची नोंद झाली आहे. गायकवाड यांचे पती माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या अकाली निधनामुळे २००० मध्ये ही पोटनिवडणूक झाली होती.

जिल्ह्यात पूर्वी विधानसभेचे १२ मतदारसंघ होते. त्यात शाहूवाडी मतदारसंघाचा समावेश होता. १९८५, १९९५ व १९९९ अशा तीन निवडणुकीत या मतदारसंघातून कै. संजयसिंह गायकवाड विजयी झाले होते. १९९९ च्या निवडणुकीनंतर वर्षभरातच कै. गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. ३ ऑक्टोबर २००० ला या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी संजीवनीदेवी गायकवाड 'गोकुळ'च्या संचालिका होत्या.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यासह राज्य पातळीवरील दोन्ही काँग्रेसचे नेते प्रयत्नशील होते. पोटनिवडणूक जाहीर झाली आणि शिवसेनेकडून रमेश लटके, तर अपक्ष म्हणून माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी अर्ज दाखल केले.

१९९० च्या निवडणुकीत पाटील-सरूडकर हे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. या जोरावरच ते पुन्हा रिंगणात उतरले होते. देशात पहिल्यांदा केरळ राज्यातील एक पोटनिवडणूक इलेक्ट्रॉनिक यंत्रावर झाली होती. राज्यात पहिल्यांदा या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर झाला.

निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात संजीवनीदेवी गायकवाड चार हजार १२१ मताधिक्यांनी विजयी झाल्या. त्यानंतर त्यांचे पुत्र 'गोकुळ'चे संचालक कर्णसिंह यांनी २००४, २००९ व २०१४ ची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढविली, पण त्यात त्यांना अपयश आले.

तत्कालीन मुख्य निवडणूक मतदारसंघात ठाण मांडून मतदान यंत्राच्या प्रसारासाठी आणि लोकांच्या जनजागृतीसाठी राज्याचे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त प्रमोद देव मतदारसंघात ठाण मांडून होते. त्यावेळी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी होते अजित रेळकर, तर जिल्हाधिकारी होते अरविंद सिंग, या दोघांनीही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT