Karad, 23 May : राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कऱ्हाडने अनेकदा नेतृत्व, विचार आणि संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या या भूमीने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आपले वजन वाढवून राजकारणाचा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि आता काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्षपद कऱ्हाडकडे आले आहे. त्यातून जिल्ह्याच्या राजकारणाचा कऱ्हाड हे केंद्रबिंदूच ठरले आहे.
राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि संवेदनशील म्हणून कऱ्हाडची राज्यात ओळख आहे. कऱ्हाडने राज्याला यशवंतराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन मुख्यमंत्री दिले. त्यामुळे कऱ्हाड हे राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरते. कऱ्हाडची राजकीय परंपरा ही केवळ व्यक्ती केंद्रित नसून विचार, सहकार, शिक्षण आणि संघटन यांच्या आधारे विकसित झालेली मानली जाते.
सध्या अनेक वर्षांनंतर तसाच योगायोग जुळुन आला आहे. भाजपचे डॉ अतुल भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने जिल्हाध्यक्षपद कऱ्हाडकडे आहे. आता कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या रुपाने कऱ्हाडलाच मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षांनी नेतृत्वासाठी कऱ्हाडवर शिक्कामोर्तब केले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच कऱ्हाडमध्ये तीन राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, त्यामुळे राजकीय केंद्रबिंदूच कऱ्हाडला झाल्याचे दिसत आहे. इतिहासात पहिल्यांदाच तीन प्रमुख राजकीय प्रवाहांची संघटनात्मक सूत्रे कऱ्हाडमध्ये एकवटल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय हालचाली, निर्णय आणि नेतृत्वाचे केंद्र पुन्हा कऱ्हाडच राहणार आहे.
परिणाम जिल्हाभर दिसणार
जिल्हाध्यक्षपद मिळणे हा राजकीय प्रतिष्ठेचा विषय असला तरी त्याचे खरे मोजमाप संघटना उभारणी आणि पक्ष विस्तारातून होत असते. अनेकदा पदे मिळाल्यानंतर स्थानिक गटबाजी, अपेक्षा आणि कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन ही मोठी आव्हाने ठरतात. त्यामुळे कऱ्हाडकडे तीन पक्षांचे नेतृत्व आले असले तरी त्याचा जिल्हाभर परिणाम दिसणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय उपस्थितीबरोबरच नव्या नेतृत्वाला संधी, स्थानिक प्रश्नांवर भूमिका आणि पक्षाची वाढ यावर पुढील राजकीय मूल्यांकन केले जाणार आहे.
नव्या राजकीय शक्तिकेंद्राची सुरुवात
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कऱ्हाडमध्ये तीन राष्ट्रीय पक्षांची जिल्हाध्यक्षपदे येणे हा योगायोग असून त्याद्वारे नव्या राजकीय शक्तिकेंद्राची सुरुवातच झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे नेतृत्व याकडे कसे पाहते आणि आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटते, हेही महत्त्वाचे आहे. भविष्यात राजकीय पटलावर कऱ्हाडचे वाढलेले वजन प्रत्यक्ष दिसल्यास हा बदल दीर्घकालीन मानला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.