Chandrkant Patil - Satej Patil
Chandrkant Patil - Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चंद्रकांतदादांचे आव्हान सतेज पाटील यांनी स्विकारले; बिंदु चौकात येण्यास तयार

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कॉंग्रेसने ५० वर्षात काय केले? हे सांगायला बिंदू चौकात येऊन चर्चा करण्यास तयार आहे असे म्हणतं काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) दिलेले आव्हान स्वीकारले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.

सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी चंद्रकांत आण्णांना आपण सर्वांनी संधी दिली होती. मात्र, लोकसेवेपायी कार्यरत असताना त्यांचं दुर्दैवी निधन झाले. लोकांच्या सेवेसाठी आण्णांनी आपल्या तब्बेतीची काळजी न करता पुरामध्ये आणि कोरोनाच्या संकटकाळामध्ये अहोरात्र कार्य केले. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आण्णांनी कृतीतून कोल्हापूरवासीयांना विकासात्मक दृष्टिकोन दिला. आण्णांचा पश्चात ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा होती. मात्र, आपल्या स्वार्थी राजकीय इच्छाशक्तीपायी भाजपने ही निवडणूक स्वाभिमानी कोल्हापूरकर जनतेवर लादली आहे.

याशिवाय कॉंग्रेसने ५० वर्षात काय केले? हे सांगायला बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. कोण किती विकास केला यावर कधीही चर्चा करायला मी तयार आहे. तुम्ही ५ वर्षे काम केले असते तर मतदारसंघ सोडून पुण्याला जाण्याची लाजिरवाणी वेळ आली नसती. जयश्री ताईंनी नगरसेवक म्हणून काम करत असताना ८ कोटी रुपयांची विकासात्मक कामे केली आहेत. कोल्हापूरच्या विकासाचे आण्णांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ताराराणींच्या नगरीतील पहिली महिला आमदार म्हणून जयश्री ताईंना आपण प्रचंड मतांनी विजयी कराल असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी काय आव्हान दिले होते

२३ मार्च रोजी सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते, थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरकरांना पहायला सुद्धा मिळाले नाही. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम फुटभरही झाले नाही. पूरग्रस्तांना दमडीसुद्धा मिळाली नाही. तुम्ही टोलची पावती फाडली आम्ही टोलमाफ केला. राज्यात ५० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. कोल्हापूरसाठी काँग्रेसने काय केले, याचा हिशोब बिंदू चौकात जाहीरपणे द्या. आम्ही भाजपच्या पाच वर्षांच्या काळात काय केले, याचा हिशोब देतो, असे थेट आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT