Chandrakant Patil-Satej Patil
Chandrakant Patil-Satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सतेज पाटलांना भाजपच्या मदतीची जाणीव राहिली नाही : चंद्रकांत पाटलांचा टोला

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : ‘कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील हे २००४ मध्ये अपक्ष निवडणुकीला उभे होते. त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले नव्हते, त्यावेळी भाजपने त्यांना पाठींबा दिला होता. हे ते आता विसरले आहेत. त्यांना भाजपच्या मदतीची जाणीव राहिली नाही,’ अशा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला. (Satej Patil Forget of BJP's help : Chandrakant Patil)

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, माझे खोटे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले जात आहेत. जे मी बोललो नाही, ते माझ्या तोंडी देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या प्रचाराची पातळी अत्यंत खालच्या थराला गेली आहे. सोशल मीडियावरील खोट्या प्रचाराबाबत तक्रार आम्ही पोलिसांकडे दिली आहे.

‘भाजपचे उमेदवार सत्यजीत उर्फ नाना कदम यांना जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची पातळी अत्यंत खालच्या थराला गेली आहे. जी विधाने आम्ही केली नाहीत, ती आमच्या तोंडी देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानांचा विपर्यास केला गेला. आमच्या पक्षात महिलांना सन्मान आहे; म्हणूनच भाजपमध्ये १५ महिला आमदार आहेत. काँग्रेसने जरी प्रचाराची पातळी सोडली असली तरी आम्ही सोडलेली नाही. आम्ही कधीही जयश्री जाधव किंवा चंद्रकांत जाधव यांच्यावर टीका केली नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीवर टिका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज आहेत. शिवसेनेला गृहमंत्रीपद हवे आहे. अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वाट्याला अवघे १० कोटी रुपये आले. त्यामुळे आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला संपवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघात करणारा पक्ष असून सत्तेसाठी ते कोणालाही जवळ करू शकतात. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे माणूस म्हणून चांगले आहेत. पण गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत.’

ऑनलाईन पैसे वाटण्याची शक्यता

कोल्हापूर शहरातील काही कॉलेज विद्यार्थी घरोघरी जाऊन एक फार्म भरून घेत आहेत. फॉर्ममध्ये मतदारांची माहिती घेतली जात आहे. जेवढे जास्त फॉर्म भरून आणणार तेवढे अंतर्गत गुण जास्त मिळणार, असे त्यांना सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी कोणत्या कॉलेजचे आहेत आणि त्यांना हे काम करण्यास कोणी सांगितले, याची चौकशी झाली पाहिजे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, नांदेडमध्ये ऑनलाईन पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला होता. कोल्हापुरातही अशाच पद्धतीने पैसे वाटले जातील, अशी दाट शक्यता आहे. त्याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT