soybean
soybean sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राहुरी कृषी विद्यापीठाचे बियाणे उगवेना : 12 शेतकऱ्यांना द्यावी लागणार नुकसान भरपाई

अमित आवारी

अहमदनगर - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेले व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने विकलेले सोयाविन पिकाचे बियाणे पेरले तरी व्यवस्थित उगवले नाही. त्यामुळे राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील 12 शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश देऊन 12 शेतकऱ्यांना तीन लाख 72 हजार 790 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ( Seeds produced by Rahuri Agricultural University do not germinate: 12 farmers will have to pay compensation )

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की, राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी 2016 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी उत्पादित केलेले व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने विकलेले सोयाविन पिकाचे J.S. 9305 या व्हराईटीचे बियाणे खरेदी करून लागवड केल्यानंतर त्याची उगवन सामाधानकारक न झाल्याने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर समितीने या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष येऊन पाहणी करून सरासरी 24 टक्के बियाणांचे उगवन झाल्याबावत अहवाल दिला होता.

या शेतकऱ्यांनी अपेक्षित रोपे उगवन न झाल्याने झालेले नुकसान भरून देण्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी उत्पादित केलेले व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यांच्याकडे मागणी केली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रार क्रमांक 316/2016 318/2016 ते 328/2016 अशा एकूण 12 तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यांनी हजर होऊन सदर बियाणे मुळीच दुषित नव्हते व त्याची उगवन क्षमता चांगली होती, अशी भूमिका घेत समितीने बनवलेला अहवाल शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नाही. बियाणांची उगवन शक्ती होणे हे पूर्णपणे जमिनीचा पोत, हवामान, तापमान, पेरण्याची पद्धत, पाण्याचा नियमीतपणा, पुरेसा पाणीपुरवठा, खते, औषधे, किटकनाशके आदींवर अवलंबुन असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले बांधील नाही, असे म्हणणे मांडले होते.

तक्रारदार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्य बियाणे महामंडळ यांचे सर्व म्हणणे खोडून काढले. पुरावे दाखल केल्याने मे जिल्हा आयोगाने तक्रारदार यांचे म्हणणे ग्राहय पकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने या मच्छिंद्र चौधरी, मच्छिंद्र घोलप, किशोर बनकर, बद्रीनाथ गाढवे, मंदा गाढवे, संतोष कुदळे, संभाजी कुंदे, रामनाथ भवार, दादासाहेब सोनटक्के, राजेंद्र भवार, संजय भवार, सुभाष करीर या सर्व तक्रारदारांना मिळुन त्यांची बियाणी खरेदीची एकुण रक्कम एक लाख 56 हजार 790 रुपये त्यावर बियाणी खरेदी केल्याच्या तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळे पर्यंत दरसाल दर शेकडा 9 टक्के दराने व्याज दयावे. या प्रत्येक शेतकऱ्यांस आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 15 हजार व तक्रारीचा खर्च तीन हजार देण्याचे आदेश केलेले आहे.

हे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदाणी, सदस्या सी. व्ही. डोंगरे व सदस्य एम. एन. ढाके यांनी केले. या तक्रारीमध्ये तक्रारदार यांच्यातर्फे अॅड. श्याम आसावा यांनी काम पाहिले.

तक्रारदार शेतकरी व त्यांना मिळणारी नुकसान भरपाई

मच्छिंद्र चौधरी - 24920

मच्छिंद्र घोलप - 29530

किशोर बनकर - 39980

बद्रिनाथ गाढवे - 47850

मंदा गाढवे - 24950

संतोष कुदळे - 29980

संभाजी कुंदे - 39140

रामनाथ भवार - 19370

दादासाहेब सोनटक्के - 31220

राजेंद्र भवार - 24950

संजय भवार - 24950

सुभाष करीर - 24950

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT