Raghunath Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raghunath Patil : रघुनाथदादांचा गंभीर आरोप; सरकारकडून पीकविम्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार

Anil Kadam

Sangali News : पीकविमा योजनेत सरकार आणि विमा कंपन्या यांचे साटेलोटे आहे. शेतकऱ्यांच्या नावावर सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत केला. एकीकडे दुष्काळी उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात कर्ज वसुलीला स्थगिती आहे. मात्र बँका, पतसंस्थांकडून शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे जप्तीच्या नोटिसा बजावल्या जात असल्याच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या चुकीचा धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला जात आहे, त्यामुळे सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी. जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शासनाने जिल्हा टंचाईसदृश जाहीर केला असेल त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, बँका पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बेकायदेशीर कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्याला विमा कंपनी निवडण्याचा पर्याय देण्यात यावा, सरकारने विमा कंपन्या निश्चित करू नयेत. शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, बंद पडलेले ऊस कारखाने पुन्हा सुरू करावेत. दोन ऊस कारखान्यांमधील हवाई अंतराची बंधने काढून टाका. सर्वांसाठी अफू शेतीचा परवाना द्यावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचावे. जीएम बियाणांच्या वापरावर लादलेले निर्बंध उठवावेत. वन्य प्राणी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या बेदखल ठरवत आहे. त्यामुळे या मोर्चाद्वारे याबाबतचा जाब विचारला जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, शिवाजी पाटील, आमगोंडा पाटील, नंदकुमार पाटील उपस्थित होते.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT