Shahajibapu Patil-Deepak Salunkhe  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी दीपक साळुंखेंना डिवचले; ‘मला मैदान सोडायची सवय नाही, निवडणूक ताकदीने लढणार’

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 August : मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत, निवडणुका होणारच आहेत. जनता जो कौल देईल, तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे. मी सदैव मैदानात असतो, मैदान सोडायची मला सवय नाही.

आगामी विधानसभेची निवडणूक मी सांगोला मतदारसंघातून ताकतीने लढणार आहे, असे आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी महायुतीमधील सहकारी दीपक साळुंखे यांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शहाजीबापू पाटील यांनी आपण मैदान सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची अनेक जण अनेक ठिकाणी तयारी करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता जो कौल देईल, तो सर्वांना स्वीकारावा लागणार आहे.

दीपक साळुंखे यांनी मागील 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटील (Shahajibapu Patil) यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. अंतर्गत सर्व्हे, त्याचे निष्कर्ष आणि त्यावर दीपक साळुंखे यांच्या गटाकडून जोरदारपणे काम केले जात आहे. त्यामुळे सांगोल्याच्या लढतीकडे सोलापूर जिल्ह्याबरोबरच महायुतीच्या नेत्यांचेही लक्ष असणार आहे.

प्रशांत परिचारक यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. मात्र, त्यांना योग्य ती चांगली संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे‌, असेही शहाजी पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारे 10 ते 12 नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे. मुळात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी ही तत्त्वहीन आघाडी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाया बाजूला सारून, उद्‌ध्वस्त करून उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या विचाराच्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय शिवसैनिकांसाठी निश्चितच दुःखकारक आहे. उद्धव ठाकरे यांच्या विषयी सर्वांना आदर, प्रेम असेल पण शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत, असा दावाही शहाजीबापू पाटील यांनी केला.

भाजपपेक्षा शिंदे सेनेच्या जागा अधिक येत आहेत, असे काही सर्व्हेतून दिसून येत आहे. मात्र त्याबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, तळागाळात जाऊन काम करणारे प्रामाणिक नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यांना अनुभवी देवेंद्र फडणवीस आणि कार्यक्षम अजित पवार यांची साथ आहे, त्यामुळे आगामी सरकार हे महायुतीचेच असेल, यात कुठलीही शंका वाटत नाही, असेही शहाजी पाटलांनी ठासून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT