Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShahajiBapu Patil On MVA : शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,''शिवसेनेच्या ४० आमदारांना पाडण्याची....''

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : शरद पवारांचं उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर भाष्य, अंजली दमानिया यांचं अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं टि्वट, ठाकरे पवार भेट या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय वातावरण अक्षरश : ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, आता शिंदे गटाचे नेते व सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीतील अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमदार शहाजीबापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांनी सांगोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा हळूवार प्लॅन सुरु होता. की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना १० ते १५ जागांपेक्षा जास्त जागा निवडून येऊ द्यायच्या नाहीत. आणि त्याचवेळी दुर्दैवाने उध्दव ठाकरे हे कोरोना आणि आजारपणामुळे मंत्रालयात येत नव्हते.

शिवसेनेच्या ४० आमदारांना पाडण्याची तयारी...

हा धोका सगळा प्रकार आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या शिवसेनेचं नेतृत्व दिलं. आता आमची शिवसेना वाढणार आणि सगळ्या निवडणुका आम्ही भरघोस मतांनी जिंकणार असा आत्मविश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ४० आमदारांना पाडण्याची तयारी अजित पवार आणि थोरातांनी केला होता. मात्र, आम्ही हा महाविकास आघाडीचा डाव उलटवला.

यात माझाही समावेश होता असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटलांनी केला आहे. कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत असंही ते म्हणाले.

शरद पवार गोड बोलून कधी...

शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत .आणि मागील ४५ वर्ष ते माझे पालक होते. पण पवार साहेबांच्या राजकारणाचा इतिहास जर बारकाईने पाहिला तर त्यांच्याजवळ जो गेला आहे त्याला त्यांनी राजकारणातून संपवलं असल्याचं लक्षात येईल. त्यांनी छोटे छोटे पक्ष संपवले आहेत. शिवसेनेला ते कधीच बाप करत नसतात. शिवसेनेच्या नेत्यांनी जेवढी पवारांवर टीका केली तितकी अद्याप कोणत्याही पक्षाने केलेली नाही. पण पवार कधी गोड बोलून गळा दाबतील यांना कळणार पण नाही अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केली.

तु्म्ही तुमच्यासाठी नातवांसाठी साठवून ठेवा...

५० खोक्यांचा आरोपावरुन उध्दव ठाकरे, अजित पवार यांना इशारा देताना पाटील म्हणाले, पाटलाची औलाद आहे. पावणे दोनशे एकर शेती अशी पत्रावळी फेकतात तशी दिली आहे. ५० खोक्याची मला गरज नाही. मी कर्णाची औलाद असून माझं जे काही आहे ते घरात नेण्यासाठी नाहीतर जनतेला देण्यासाठी आहे. मात्र, तु्म्ही तुमच्यासाठी नातवांसाठी साठवून ठेवा असंही पाटील म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT