Kolhapur latest news : शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून आता कोल्हापुरात रणकंदन सुरू झाले आहे. जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात आता थेट वादाची ठिणगी पडली आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून जमिनीची मोजणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात कडाडून विरोधाचा एल्गार पुकारला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण व वादळी बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी 'आरपारच्या लढाई'चा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे.
बैठकीत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. त्यांनी शेतकऱ्यांना थेट आवाहन केले की, "शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील नांगरीच्या फाळाला धार लावून तयार ठेवावे. जर अधिकारी जबरदस्तीने मोजणी करण्यासाठी शिवारात घुसले, तर याच नांगरीच्या फाळाच्या तलवारी करून आपल्या मायभूमीचे आणि शिवाराचे रक्षण करा. कोणत्याही अधिकाऱ्याला शेतात पाऊल टाकू देऊ नका."
महिला शेतकरी रोखणार अधिकाऱ्यांची वाट
आंदोलनात आता महिलांनीही उडी घेतली आहे. ९ सप्टेंबर रोजी मोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील महिला शेतकरी स्वतः शिवारात ठाण मांडून बसणार आहेत. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि पोलीस ताफा जरी आला, तरी त्यांना शिवारात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा आक्रमक निर्धार महिलांनी केला आहे. "शिवारात रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही," अशी रक्तपाताची भाषा या बैठकीत उच्चारण्यात आली.
बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. त्यानुसार, ३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महामार्गाच्या शासकीय आदेशाची जाहीर होळी करून तीव्र निषेध नोंदवला जाईल. ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आणि मोजणीच्या आदेशाची होळी करून जिल्हा प्रशासनाला आव्हान देतील.
मोजणीच्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला गावबंदी आणि शिवारबंदी करून अधिकारी व पोलिसांना गावातच रोखले जाईल. प्रशासनाने ९ सप्टेंबरपासून मोजणीची जय्यत तयारी सुरू केली असली, तरी शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता सरकार शेतकऱ्यांच्या या रोषापुढे नमते घेणार की बळाचा वापर करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बैठकीस गिरीष फोंडे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, कृष्णात डी पाटील, नामदेव यादव, भगवान पाटील, कृष्णात साबळे, अमित नाळे यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.