Shambhuraj Desai On Statue Collapse.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai: छत्रपतींचा पुतळा का कोसळला? मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं 'हे' कारण

Umesh Bambare-Patil

Satara Shivsena News : मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी आहे. मात्र, तो एक अपघात असून समुद्रकिनाऱ्यावर खाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटरचा होता. त्यामुळे पुतळ्याने गंज पकडल्याने हा अपघात झाला असल्याचा दावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या जागेवर पुन्हा तितकाच भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले आहे. विरोधकांनी या मुद्द्याचे राजकारण करू नये, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वांनाच वंदनीय आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, असा इशाराही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला शिवपुतळा कोसळला, याविषयावर शंभूराज देसाई म्हणाले, ही घटना दुर्दैवी असून तो अपघात होता. समुद्रकिनाऱ्यावर खाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटरचा होता. त्यामुळे पुतळ्याने गंज पकडल्याने हा अपघात झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून त्या जागी तसाच भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात विरोधकांनी कोणतेही राजकारण करू नये. महाविकास आघाडीचे नेते वेगवेगळ्या विषयांवर उठसूट महायुतीच्या तीन घटक पक्षांवर सातत्याने टीका करत असतात. त्यांच्या संदर्भात बोलणे योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला

बदलापूर प्रकरणातील कारवाई संदर्भात आदित्य ठाकरे यांनी महायुती शासनावर टीका केली होती. या संदर्भात शंभूराज देसाई म्हणाले, आदित्य ठाकरे स्वतः मंत्री होते. पोलिस कारवाई कशी असते याची त्यांना पूर्ण माहिती आहे. या प्रकरणांमध्ये अपशब्द वापरणाऱ्या इसमावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची पडताळणी उपअधिक्षक दर्जाचा अधिकारी करत आहे. यामध्ये तथ्य आढळून आल्यानंतर दोषींवर निश्चित कारवाई होईल.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक हजार यात्रेकरूंना महाराष्ट्रतील आणि अन्य राज्यातील तीर्थक्षेत्रांवर सहलीसाठी पाठविले जाणार आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून स्थळे ठरवली जातील. लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून एक लाख ८७ हजार प्रकरणाची छाननी झाली आहे.

तसेच 7 लाख 9 हजार पात्र लाभार्थी बहिणींना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आठ हजार लाडक्या बहिणींचे प्रस्ताव नाकारण्यात आलेले आहेत. यामध्ये नाव चुकीचे असणे आधार कार्डला खाते लिंक नसणे अथवा पत्त्याचा घोळ असे तांत्रिक कारणे आहेत. मात्र ती दुरुस्त करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेला महायुती बाजी मारेल...

महायुतीच्या जागा वाटपाबाबत मंत्री देसाई म्हणाले, आमची महायुती अत्यंत मजबूत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे खासदार झाल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे.आता दोन खासदार, सहा आमदार असे आमचे राजकीय बलाबल झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे आमदार बाजी मारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT