Sharad Pawar criticism on Mahayuti government Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar on Ladki Bhain Yojna : 'पण एक गंमत आहे, गेल्या 10-20 वर्षांत बहीण आठवली नाही' ; पवारांचा महायुती सरकारला चिमटा!

Mayur Ratnaparkhe

Sharad Pawar Phaltan News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज(सोमवार) फलटणचे आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी 'तुतारी' हाती घेतली. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. याप्रसंगी शरद पवार यांनी भाषण करताना सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शिवाय सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही पवारांनी टोला लगावला.

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, 'आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र उभा करण्यासाठी एकेकाळी माझ्यासारखी व्यक्ती महाविद्यालयात शिकत होती. त्यावेळी महाराष्ट्रात महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ झाली. त्या चळवळीत फलटणी सुद्धा सहभागी होतं. तुम्ही सर्वांनी धैर्यशील मोहितेंना निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आता दुसरी लढाई महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? महाराष्ट्र सामान्य जनतेच्या हाती द्यायाचा की आणखी कुणाच्या हाती द्यायचा? '

याचबरोबर 'आज सांगितलं जातं की आम्ही नवनवीन योजना काढल्या. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. कधी बहिणीबद्दल असतात. कुठल्याही व्यक्तीला स्वत:च्या बहिणीबद्दल आस्था ही असतेच. बहीण ही आपल्या जीवाभावाची कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती असतेच आणि म्हणून बहिणीचा सन्मान केला, तर त्याबद्दल माझ्यासारख्याला तुम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतो. पण एक गंमत आहे, गेल्या दहा-वीस वर्षांत बहीण आठवली नाही. पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnavis) नेतृत्वात, महाराष्ट्राचं राज्य त्यांच्या हातात होतं. तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही.'

'बहीण दिसली कधी? कालच्या लोकसभेला महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा आम्ही लोकांनी तुमच्या पाठिंब्याने जिंकल्या. त्याचा परिणाम असा झाला, की बहीण आठवली. त्याच्याआधी बहीण आठवली नव्हती, त्यावेळी बहिणीचं काही नव्हतं.' असा शब्दांत शरद पवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

याशिवाय 'लोक राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणे आहेत, लोकांना कळतं. काय करायचं, कुठं करायचं कुणासाठी करायचं? आणि आज या महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती द्यायची, याचा निकाल घेण्याची वेळ आली आहे. मी स्वत: काही निवडणुकीला उभा नाही, चौदा वेळेला निवडणूक लढलो, सात वेळेला दिल्लीची आणि सात वेळेला महाराष्ट्राची, तुम्ही थांबवलंच नाही. अहो सालकऱ्याला सुद्धा सुट्टी देतात पण मला चौदा वर्षांत तुम्ही सुट्टीच दिली नाही. ठीक आहे, तुम्ही सांगितलं काम करा. काम करत राहील.

तसेच 'पण आता निवडणूक लढायची नाही. मात्र एक गोष्ट करायची ज्या महाराष्ट्राने मोठं केलं, माझ्या सारख्याला चारवेळेला मुख्यमंत्री केलं. माझी नैतीक जबाबदारी आहे की महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे. महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात परिवर्तन करायचं आणि हे सूत्र मी कायम लक्षात ठेवलं आहे.' असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT