Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: '' ...पण देशाचे गृहमंत्री आता पुजाऱ्यांची जबाबदारीही घेताहेत ! '' ; पवारांची मिश्किल टिप्पणी

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar On Amit Shah : भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथील राम मंदिराची उद्घाटनाची तारीख जाहीर केली. १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचं उद्घाटन होईल असं मोठं वक्तव्य शाह यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.यावर काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मिश्किली टिप्पण्णी केली आहे.

शरद पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरील भाष्य केले. पवार म्हणाले, खरंतर देशाच्या गृहमंत्र्यांचा विषय आहे की नाही हे सांगता येणार नाही. पण राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख सांगितली राम मंदिराच्या एखाद्या पुजाऱ्याने सांगितली असती तर बरं झालं असतं. पण आता पुजाऱ्यांची जबाबदारी सुध्दा गृहमंत्री आता घेत आहेत. पण काही हरकत नाही अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे. तसेच लोकांचे जे मुख्य प्रश्न आहेत त्यापासून लक्ष हटविण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा सत्ताधारी पक्षाकडून काढण्यात येत आहे अशी टीकाही पवारांनी केली आहे.

विरोधकांचं एकमत व्हायला भारत जोडो यात्रेचा उपयोग होईल...

राहुल गांधींच्या बाबतीत सत्ताधारी पक्षानं टिंगलटवाळी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानंतर भारत जोडो यात्रेवर देखील टिकाटिप्पणी करण्यात आली. पण गांधी यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर या यात्रेचं स्वरुप फक्त काँग्रेसपुरतं मर्यादित न ठेवता त्याला सर्वसमावेशक स्वरुप दिलं. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचेच नाही तर विविध पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या यात्रेत गांधीच्या विचारांच्या संस्था, संघटना सहभागच घेत असतात. पण या यात्रेत सर्वसामान्य लोकं, स्त्रिया यांची उपस्थिती, सहानुभूती मोठी होती.

यामुळे गांधींकडे बघण्याकडं आणि त्यांची प्रतिमा दूषित करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत होता त्याला उत्तर मिळालं. आणि केरळपासून ते काश्मीरपर्यंत असा एवढा मोठा कार्यक्रम राबविणं सोपं नव्हतं. पण तो कार्यक्रम राहुल गांधी राबवत आहे. आणि विरोधकांचं एकमत व्हायला या पदयात्रेचा देखील नक्की उपयोग होईल असेही शरद पवार म्हणाले.

सत्ता हाती असलेल्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत. पण तसं चित्र सध्याच्या सरकारबाबत पाहायला मिळत नाही. आताच्या सरकारकडून सातत्यानं याला तुरुंगात घालेल, त्याचा जामीन रद्द करु अशी विधानं केली जाताहेत. पण ही काय राज्यकर्तेंची कामं नाहीत. त्यामुळे सरकारनं पाय जमिनीवर ठेवून काम करायला हवं अशा शब्दांत पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले.

कोश्यारी पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल....

महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील.या सर्व राज्यपालांनी त्यांचा पक्ष कोणताही असला तरी पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना अबाधित ठेवली.

भगतसिंह कोश्यारी पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही. ते सतत चुकीची वक्तव्यं करत आहेत. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT