Pune News : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे टपाल विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांची आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम, बँक पासबुक, चेकबुक यांसह महत्त्वाची कागदपत्रे नदीकिनारी जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे, जळालेल्या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना पाठवलेले शासकीय पत्रही आढळले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
गावच्या पश्चिम बाजूला कुकडी नदीच्या काठावर सचिन लोहोकरे यांना कागदपत्रांचा ढीग जळताना दिसला. त्यांनी तत्काळ भाऊ स्वप्निल लोहोकरे आणि इतर ग्रामस्थांना घटनास्थळी बोलावले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर टपाल जळून खाक झाले होते.
विखे-पाटलांचं शेरकरांना पत्रही जळालं!
या घटनेत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे अर्धवट जळालेल्या कागदपत्रांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना पाठवलेले शासकीय पत्र आढळले. हे पत्र टपाल व्यवस्थेतून शेरकरांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना, ते नदीकिनारी जाळलेल्या कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात सापडल्याने टपाल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मंत्री आणि एका महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांमधील अधिकृत पत्रव्यवहार अशा प्रकारे जाळलेल्या टपालात सापडल्याने या घटनेकडे आता केवळ नागरिकांच्या कागदपत्रांच्या नुकसानीपुरते पाहिले जात नाही. सरकारी पत्रव्यवहाराची हाताळणी नेमकी कशी झाली, टपाल नागरिकांपर्यंत का पोहोचले नाही आणि ते नदीकाठी नेऊन का जाळले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आधार-पॅनपासून पासबुक, चेकबुकपर्यंत कागदपत्रे जळाली
या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणावर बँक पासबुक, चेकबुक, खासगी पत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची पत्रे किंवा विविध सरकारी कामांशी संबंधित कागदपत्रेही यामध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डाकसेविकेनेच टपाल जाळल्याचे तपासात निष्पन्न
घटनेची माहिती मिळताच जुन्नरचे डाक निरीक्षक संजय शिराळशेठ आणि अमोल मते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी शिरोली बुद्रुक टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर रामू वाबळे आणि सरपंच प्रदीप थोरवे उपस्थित होते.
वितरणासाठी देण्यात आलेले हे टपाल डाकसेविका जान्हवी गायकवाड यांनीच जाळल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे डाक निरीक्षक संजय शिराळशेठ यांनी सांगितले. या प्रकरणी केंद्रीय टपाल प्रशासनामार्फत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.