Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमचा एकच बसला तर तुम्हाला आईचे दूध आठवेल : तानाजी सावंतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विश्वभूषण लिमये

सोलापूर : आम्ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीवर (NCP) प्रचंड नाराज आहोत. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये, असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल, असा इशारा शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. (Shiv Sena MLA Tanaji Sawant criticizes Congress-NCP)

वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार सावंत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अत्यंत कडक शब्दांत आगपाखड केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीत मागील अडीच वर्षांत आपला केवळ अपमानच झाला आहे. आपला केवळ आपमानच होणार असेल, तर साहेब विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना केले. मागील अडीच वर्षांत विविध ठिकाणच्या शिवसैनिकांना फोडल्याचे दाखले देत तानाजी सावंत यांनी अन्यायचा पाढा वाचला.

आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना हा विस्थापित्यांचा गट, कोणीही आजमावून बघू नये. महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली असतानाही आमच्या पक्षाला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पामध्येही हेच दिसून आलं आहे. सुमारे ६० ते ६५ टक्के निधी राष्ट्रवादी काँग्रेसला, ३० ते ३५ टक्के काँग्रेसला, तर अवघा १६ टक्के निधी हा शिवसेनेला मिळतो. उच्च व तंत्रशिक्षण विभाग शिवसेनेकडे असल्याने त्यातूनच पगारवर सहा टक्के निधी खर्च करावा लागतो. त्यामुळे विकास कामासाठी केवळ 10 टक्के निधी राहतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्यदेखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन २५-१५ योजनेतून एक एक, दीड दीड कोटी रुपयांची कामे आणतो आणि येथे येऊन आमच्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, ते यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळते. आम्हाला केवळ गोड बोललं जात. आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच घडी विस्कटण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही.

आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? केवळ स्टेजवर बोलण्यापुरते भाजपवाले तुमचे विरोधक आहेत का? आतून तुमची त्यांच्याशी सेटिंग आहे का? शिवसेना विश्वासघात सहन करणार नाही, असा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला देण्याची गरज आहे. कोल्हापुरात आमची जागा असूनही आम्ही महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे ती जागा काँग्रेसला सोडली. कोल्हापुरात पूर्वी शिवसेनेचे सहा आमदार होते, आता केवळ दोनच आमदार आहेत. या असल्या गोष्टींमुळे संख्याबळ घटले आहे.

शिवसैनिकांनी शिवभोजन थाळीच चालवायची का?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही उस्मानाबादमधून हद्दपार केले आहे. आगामी निवडणुकीत छुप्या मार्गाने ते आपल्याशी लढत आहेत. शिवसेनेचा जो माणूस ताकदीने काम करत असेल त्याच्या पायात खोडा घालून शिवसेनेला मागे खेचले जात आहे. हे सर्वत्र होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपल्यावर अस्त्र चालवत आहेत. हातात हात घालून बसलेले असताना आम्हालाच का टार्गेट करता. समोर शत्रू दिसत असताना तुम्ही त्याच्याशी लढत नाही. शिवसेना समोरासमोर लढते. आमच्या पक्षप्रमुखांशी वेगळी भाषा आणि शिवसैनिकांशी वेगळी वागणूक ही त्यांचं असं चाललं आहे. यांचा ग्रामपंचायत सदस्यही कोट कोट दोन कोटींची कामे आणतो. त्यात चाळीस लाख रुपये कमवायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी शिवभोजन थाळी चालवायची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT