ShivendraRaje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShivendraRaje Bhosale News : 'इतकी वर्षे ब्रिटिश म्युझियममध्ये वाघनखे होती, त्यावेळी..' ; शिवेंद्रसिंहराजेंचा संतप्त सवाल!

Umesh Bambare-Patil

Wagh Nakh and ShivendraRaje Bhosale : 'वाघनखे खरी का खोटी, हा विषय आत्ताच का निघाला? इतकी वर्षे ब्रिटिश म्युझियममध्ये वाघनखे होती, त्यावेळी कोणी का आक्षेप घेतला नाही? भारतात तसेच महाराष्ट्रात येणार म्हणून हा विषय का निघतो? विजय मल्ल्याने टिपू सुलतानची तलवार विकत घेऊन भारतात आणली, त्यावेळी ती तलवार खरी की खोटी, हे कोणीही विचारले नाही.

मग, शिवाजी महाराजांची वाघनखे खरी का खोटी, हा प्रश्न का विचारला जातो?' अशा प्रतिक्रिया देत, कुठल्यातरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन बोलणं थांबवावं, असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इतिहासकार व इतिहास संशोधकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात येत्या 19 जुलैला येत आहेत. या वाघनखांच्‍या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(ShivendraRaje Bhosale) यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला, त्‍या वेळी ते बोलत होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याचे नाव आहे. येथील संग्रहालयात ही वाघनखे ठेवली जाणार आहेत. ती सर्वांना पाहता यावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन झाले आहे. वाघनख्यांच्‍या स्वागतासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) येणार आहेत. सातारकरांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, ती वाघनखे पाहण्‍याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. त्यामुळे 19 जुलैला सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.’’

अफजल खानाचा कोतळा काढला, हे पोस्टर लावण्याबाबत किंवा गणेशोत्सवात देखावा सुद्धा करून दिला जात नाही. याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘यावरून सांगलीला दंगल झाल्यामुळे त्‍यावर बंदी आणली होती; पण हा इतिहास आहे. कुणी या बाबीवर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यातील ही लढाई होती. खान स्वराज्यावर चालून आला होता.

लढाईत कुणीतरी जिवंत राहणं आणि कोणाचा तरी मृत्यू होणार, हे ठरलेलं असतं. त्यामुळे या लढाईला कोणी दुसरी किनार देऊ नये, तसेच काही लोक वाघनखे खरी की खोटी हा विषय काढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीने दुमत निर्माण होतील, असे विषय का येतात?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे-

विशाळगडावरील अतिक्रमणांवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. आता तुम्ही गडकिल्ल्यावरील अतिक्रमणांबाबत भूमिका घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘आपल्याकडील गडांवर किंवा धार्मिक स्थळांवर अतिक्रमणे झाली आहेत.

ती अतिक्रमणे जिल्हा प्रशासनाने किंवा राज्य प्रशासनाने काढली पाहिजे. यापूर्वी प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचे अतिक्रमण प्रशासनाने काढले होते. त्यामुळे अशी अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT