Rajesh Kshirsagar and Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरकरांचे दुर्दैव...केसरकर आता पालकमंत्री नाहीत! मुश्रीफांच्या कार्यपध्दतीवर शिंदे गट नाराज

Rahul Gadkar

Kolhapur News : अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. सत्तेतील राष्ट्रवादीच्या सहभागामुळे महायुती भरभक्कम झाल्याचा दावा केला जात आहेत. पण राष्ट्रवादीमुळे महायुतीतील शिंदे गट चांगलाच नाराज झाला आहे.

राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होताच चांगली खाती पदरात पाडून घेतलीच शिवाय पुणे, बीड कोल्हापूरसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही मिळवलं. यामुळे शिंदे गटाकडून वारंवार उघड-उघड नाराजीही बोलून दाखवली गेली. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आता कोल्हापुरातही शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी (ता.20) कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) असते तर कोल्हापूर शहराचा कायापालट झाला असता. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात तडफदार कामगिरी केली.मात्र, कोल्हापुरकरांचे हे दुर्दैव आहे, की ते आता पालकमंत्री पदावर नाहीत अशी खंत व्यक्त केल्यामुळे राज्यात एकत्र नांदत असलेल्या महायुतीत कोल्हापुरात खटके उडण्याची शक्यता आहे.

क्षीरसागर काय म्हणाले...?

महानगरपालिकेतील काही अधिकारी पालकमंत्री मुश्रीफ यांचे चुकीच्या पद्धतीने कान भरत आहेत. पालकमंत्र्यांना चुकीच्या पद्धतीने गायडन्स होत असेल तर त्यांनी देखील ते समजून घेणे गरजेचे आहे. मात्र या स्मारकाचे पुन्हा अधिकृत लोकार्पण सोहळा करण्यासाठी मी पालकमंत्र्यांकडे मागणी करेन, असेही क्षीरसागर म्हणाले.

तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम अद्याप अपूर्ण होते. काम पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर कार्यक्रम होणार होता. मात्र, कोणीतरी संभाजी महाराजांच्यावर जास्त भक्ती असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. मात्र, पालकमंत्री यांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम अधिकृत आहे का हे पाहणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे काही उचापती करणारे नेते...

मात्र या सोहळ्यावरून क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. छ.संभाजी महाराजांच्या लोकार्पण सोहळा हा काँग्रेसचा नव्हता. त्यावर त्यांचे नाव छापले नव्हते. मात्र, त्यामध्ये काँग्रेसचे काही उचापती करणारे नेते जे काम काही करत नाहीत.केवळ आपल्या संस्था, हॉस्पिटल वाढवण्याचे काम करतात, त्यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात क्षीरसागर यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या आमदारांवर टीका केली.

यापुढे काँग्रेस देशामध्ये आणि राज्यामध्ये कधी सत्तेवर येणार नाही. यामुळे ते हिंदुत्वाकडे वळत आहेत. मात्र गेल्या साठ वर्षांत हिंदुत्वाची तुम्ही केलेली गळचेपी हे नागरिक विसरणार नाहीत असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT