Ranjeetsinha Nimbalkar News:
Ranjeetsinha Nimbalkar News: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjeetsinha Nimbalkar News: जनतेशी कमी झालेला संपर्क रणजितसिंह निंबाळकरांना अडचणीचा ठरणार?

दत्तात्रय खंडागळे

Nira Ujva-dava Kalwa Latest News: निरा उजवा - डावा कालव्याचा पाण्यासाठी झालेला संघर्ष, थेट बारामतीकरांनाच शिंगावर घेऊन वाढीव पाण्यासाठी केलेले प्रयत्न, संपूर्ण मतदारसंघात विविध कामांसाठी मंजूर झालेला मोठा निधी या विविध कारणांनी माढा मतदारसंघ गेल्या चार वर्षात नेहमीच चर्चेत राहिला आहे. 'मोदींचा चेहरा आणि मोहिते पाटलांचा करिष्मा' यामुळे 2019 मध्ये राष्ट्रवादीचा (NCP) बुरुज भाजपने ढासळला व खासदार रणजीतसिंह निंबाळकर माढ्याचे हिरो ठरले. परंतु कामांचा सपाटा असला तरी मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क कमी असल्यामुळे 'कही खुशी, कही गम' अशीच अवस्था झाली आहे. (Decreased contact with the public will be a problem for Ranjitsinh Nimbalkar?)

माढा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 साली विजयसिंह मोहिते - पाटील यांनी हा गड शाबूत ठेवला. परंतु 2019 मध्ये मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपने या मतदारसंघात नवी कोरी पाटी राहिलेले रणजीतसिंह निंबाळकर यांना मैदानात उतरवले. त्यांनी राष्ट्रवादीचा हा गड ढासळला व भाजपचा (BJP) मतदार संघावर झेंडा प्रस्थापित केला.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघांतील माण, खटाव सांगोला यासारख्या दुष्काळी भाग असल्यामुळे नेहमीच पाण्याचा प्रश्न चर्चेत असतो. कोणतीही निवडणूक असो या परिसरात पाण्याचाच मुद्दा चर्चेला जात असतो. निरेच्या पाण्यासाठी त्यांनी थेट बारामतीकरांसमोरच दंड थोपटले होते. त्यामुळे पुन्हा ते या दुष्काळी पट्ट्यात चर्चिले जाऊ लागले.

या मतदारसंघात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर सांगतात. नीरा देवधर प्रकल्पास 3 हजार 976 कोटी रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आवर्षण प्रवण भागातील 10 हजार 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (Nira Ujva-Dava Kalwa)

पंढरपूर - फलटण रेल्वे मार्गासाठी 1 हजार 197 कोटी, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना, सांगोला उपसा सिंचन योजना, दहिगाव योजना, खैराव - मानेगाव उपसा सिंचन योजनेसह इतर अनेक छोट्या मोठ्या योजना निदिरुप्त केल्यामुळे मार्गे लागणार आहेत. या मतदारसंघातील महत्त्वकांक्षी कृष्णा - भीमा स्थिरीकरणाच्या जवळपास 55 हजार कोटी रुपयांच्या कामांना तत्वता मान्यता देऊन राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे निधीसाठी पाठवणार आहेत. (Solapur News)

सांगोला सारख्या दुष्काळी भागासाठी दोन टीएमसीच्या सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लागणार असल्याने दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न काही अंशी मिटणार आहे. त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्या भागातील आमदार प्रतिनिधींनी प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. सिंचन प्रकल्पाबरोबरच रस्त्यांच्या कामासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महुद - सांगोला रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी 255 कोटीची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर मुंबईहून अकलूज, पंढरपूर, हैदराबाद मार्गे जाणाऱ्या बुलेट ट्रेन बाबतही येथील नागरिक मोठी आशावादी आहेत. निधीच्या बाबतीत या मतदारसंघावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते केंद्राने कृपादृष्टीच केली असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिकांशी संपर्क ठेवण्यात अपयशी -

अनेक मोठ्या योजनांना केंद्राकडून निधी आणण्यासाठी खासदार नाईक - निंबाळकर यांच्याकडून पाठपुरावा होत असला तरी नागरिकांच्या स्थानिक प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. निवडणुकीत व निवडणुकीनंतर आपण सातत्याने संपर्क ठेवून येथील स्थानिक प्रश्नासाठी आढावा घेत जावू असे सांगणारे खासदार मात्र महिनोंन - महिने स्थानिकांशी संपर्कात येत नाहीत. नेत्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे खासदार नाईक निंबाळकर यांनी सातत्याने मतदारांच्या त्यांच्या अडचणीसाठी संपर्कात राहावे असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

खा. निंबाळकरांच्या 'लाव रे फोन'ची चर्चा -

राज्यात राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडिओ' या वाक्यानंतर आता या मतदारसंघात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या 'लाव रे फोन'ची चर्चा नागरिकांत सुरू आहे. ज्या मतदारसंघात आढावा बैठक किंवा इतर कोणती बैठकीत स्थानिक नागरिकांनी एखादा प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना 'लाव रे फोन' असे म्हणत संपर्क करतात. तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्यांच्या लाव रे फोनची चर्चा सुरू असते. परंतु मतदार संघात अशा आढावा बैठका सातत्याने दुर्दैवाने होताना दिसत नाहीत.

निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने आमच्या लक्षात आहेत. खासदारांनी त्या आश्वासनांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यांनी निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे सतत आढावा बैठका घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया सांगोला येथील संगेवाडीतील संतोष खंडागळे यांनी दिली आहे.

तर माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील ज्योती पाटील म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून रखडलेला लोणंद - पंढरपूर रेल्वे मार्ग विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तो मार्गी लावला आहे. नीरा भाटघर धरणावरील निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी निरा डावा कालव्याला वळवलेले होते ते पाणी पुरवर्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. मुंबई -बंगळूर इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथील हजारो एकर जमीन समाविष्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच, मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्यासाठी खासदारांना मोठे यश आले आहे. इतर खासदारांच्या मानाने नाईक - निंबाळकर यांनी मतदारसंघात जास्त संपर्क ठेवला आहे. माढा तालुक्यातील मानेगाव उपसा सिंचन योजना सारख्या इतर अनेक योजनांना निधी मंजूर केल्याचं माढा येथील योगेश पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT