अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांनी २०० रुपयांचा नवा हप्ता जाहीर करून ऊस उत्पादकांना एकूण ३००३ रुपये दिल्याची घोषणा केली.
निवडणुकीत जाहीर केलेले ३५०० रुपये अजून न मिळाल्याने विरोधकांनी टीका केली, त्यावर पाटील यांनी विरोधकांनीही भाव जाहीर करावा असे आव्हान दिले.
माढा मतदारसंघातील निवडणुकीत ऊसदर हा प्रमुख मुद्दा ठरला होता, ज्यामुळे अभिजीत पाटील यांना विजय मिळवता आला.
Solapur, 30 September : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांनी दोनशे रुपयांचा हप्ता जाहीर करून आतापर्यंत एकूण ३००३ रुपये दिले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत ३५०० रुपये भाव देण्याचे पाटील यांनी जाहीर केले होते. त्यावरून त्यांनी पुन्हा टोलेबाजी केली आणि विरोधकांनी ३५०० रुपये जाहीर करावेत, मी लगेच तयार आहे. आपल्या ३५०० रुपयांना मुडं होऊ देणार नाही, एवढा शब्द देतो, असे पाटील यांनी जाहीर केले.
गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vitthal Sugar Factory) आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत आमदार पाटील यांनी कर्जाचा मुद्दा सविस्तर मांडला. तसेच, सभासदांना दिवाळीसाठी इतर कारखान्याकडून साखर घेऊन दिली जाईल, असेही जाहीर केले. त्याच सभेत शेवटी ऊसदाराच्या मुद्याला हात घातला.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) म्हणाले, एकाने ७५ रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे, तर दुसऱ्याने शंभर रुपयांचा हप्ता काढला आहे. आता मला विचारतात तुम्ही ३५०० रुपये कधी देणार? अरं मी तर पहिल्या दिवसांपासून ३५०० रुपयला होय म्हटलंलो आहे. तुमचं किती? ते सांगा. आता त्यांनीही सभासदांना दिलं पाहिजे ना? तेही आगाऊ रक्कम देतो म्हणाले आहेत ना? मग या दोघांचंही पैसे घालवायचे आहेत ना?
त्यांनी जर शंभर रुपये हप्ता काढला असेल तर आपला दोनशे रूपये. आपले वरचे पाचशे जे आहेत, ते शिल्लक आहेत. उद्या तुमचीही वार्षिक सभा होणार आहे, तुम्हीही बॉयलर पेटवणार आहात. त्यांनी लगेच म्हणावं की, आम्ही एवढं देतो, आम्ही द्यायला लगेच तयार आहोत आणि आपल्या ३५०० रुपयांना मुडं होऊ देणार नाही, एवढा शब्द देतो, असेही अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात ऊसदराचा मुद्दा सर्वाधिक चर्चिला गेला होता. कारण, माढ्याच्या रणांगणात दोन मातब्बर कारखानदार नशीब आजमावत होते. माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, रणजितसिंह शिंदे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यात सामना झाला होता.
पाटील यांनी ऊसाला ३५०० रुपयांचा भाव देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार माजी आमदार बबनदादांनी तशी तयारी दर्शविली होती. सर्वाधिक ऊस उत्पादक असलेल्या माढा मतदारसंघात ऊसदराचा मुद्दा निर्णायक ठरला आणि अभिजीत पाटील यांनी बाजी मारली होती. प्रत्यक्षात अभिजीत पाटील यांनी उसाला ३००३ रुपयेच भाव दिल्याचे आजच्या हप्त्यावरून स्पष्ट हेात आहे.
प्रश्न 1 : आत्तापर्यंत ऊसाला किती दर मिळाला आहे?
३००३ रुपये मिळाले आहेत.
प्रश्न 2 : अभिजीत पाटील यांनी निवडणुकीत किती भाव जाहीर केला होता?
३५०० रुपये.
प्रश्न 3 : सभासदांना दिवाळीसाठी काय जाहीर केले आहे?
इतर कारखान्यातून साखर घेऊन देण्यात येईल.
प्रश्न 4 : माढा मतदारसंघात निवडणुकीत कोणता मुद्दा निर्णायक ठरला?
ऊसदराचा मुद्दा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.