Raju Shetti-Ravikant Tupkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Will Split Fifth Time : तुपकरांची शिस्तपालन समितीकडे पाठ; स्वाभिमानी पाचव्यांदा फुटणार

सरकारनामा ब्यूरो

Pune : रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समितीला ठेंगा दाखवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट अटळ मानली जात आहे. ‘मला जे काही सांगायचे होते, ते मी राजू शेट्टींना पत्रातून सांगितले आहे’ असा बाणा तुपकरांनी दाखवला आहे. पण, राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यातील मतभेदामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना पाचव्यांदा फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Swabhimani setkari sanghatna will split for the fifth time)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सदाभाऊ खोत यांच्यानंतरची मुलुखमैदानी तोफ म्हणून रविकांत तुपकरांची ओळख हेाती. पण, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आणि आठवडाभरापासून एकमेकांना आव्हानाची भाषा बोलली गेली. त्यातून कटुता वाढत गेली आणि संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी ठाकली.

रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडण्याची सूचना राजू शेट्टी यांनी केली. मात्र, तुपकर यांनी शेट्टींना पत्र लिहित शिस्तपालन समितीकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. 'मला जे काही सांगायचे आहे, ते राजू शेट्टी यांना पत्रातून सांगितले आहे,' असे तुपकरांनी म्हटले आहे. तुपकर संघटनेतून बाहेर पडले तर स्वाभिमानीतील ही पाचवी फूट ठरणार आहे.

सांगलीत जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पाहिली फूट पडली हेाती, त्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा संघटनेत फूट पडली. तर भाजपसोबत जाण्यावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये तीव्र मतभेद झाले. मात्र, भाजपने सदाभाऊंना आमदारकी आणि त्यानंतर राज्यमंत्री केल्याने खोतांनी राजू शेट्टी साथ सोडली. ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील तिसरी फूट होती.

सदाभाऊ खोत यांच्यानंतर मोर्शीतून माजी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून निवडून आलेले देवेंद्र भुयार यांनी शेट्टी यांच्या विरोधात बंड केले. त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा पर्याय निवडला. त्यांनीही राजू शेट्टींचा आदेश धुडकावत पक्षीय राजकारणाला पसंती दिली. आता रविकांत तुपकर यांच्या रुपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पाचव्यांदा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुपकरांच्या पाठीशी कोणती महाशक्ती आहे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मात्र, आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. शेतकरी चळवळीचा झेंडा आपल्या खांद्यावर कायम राहील, असा दावा ते करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत फारकत घेऊन रविकांत तुपकर हे त्यांच्या बुलडाणा प्रभावक्षेत्रात शेतकरी संघटना स्थापन करून राजू शेट्टी यांना पर्याय निर्माण करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जाते.

रविकांत तुपकर यांनी यांच्या पत्राबाबत राजू शेट्टी यांनी सांगितले की, तुपकरांच्या पत्रात नवीन काहीच नाही. माध्यमातून ते जे बोलत आहेत, तेच त्यांनी पत्रात लिहून पाठवले आहे. मला जे पत्र तुपकरांनी दिले आहे, ते मी पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे पाठविले आहे. त्यांनी मला पत्र लिहिण्याऐवजी शिस्तपालन समितीला पत्र द्यायला हवे, असा चिमटाही शेट्टी यांनी तुपकरांना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT