Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar On Talathi Exam : तलाठी परीक्षेवरून रोहित पवारांना संताप अनावर; म्हणाले "सरकारला अजिबात..."

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : महाराष्ट्र सरकारच्या वतीने घोषित केलेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा १७ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. ही परीक्षा १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर 'सर्व्हर' बंद पडल्याने गोंधळ उडाला. परिणामी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही सरकारचा तीव्र शब्दात समाचार घेतला. (Latest Political News)

महसूल खात्यांतर्गत येणाऱ्या चार हजार ६४४ जागांसाठी एका खासगी यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार अर्ज आलेले आहेत. या परीक्षेत सोमवारी अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी जिल्ह्यात नियोजित केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा मुख्य सर्व्हर बंद पडल्याने सुरू होऊ शकली नाही. यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींना ताटकळत बसावे लागले. यातील अनेक परीक्षार्थींना परतीची बस, रेल्वे आरक्षण असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याकडे लक्ष वेधत रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला काही गांभीर्य नसल्याची टीका केली.

रोहित पवार यांनी ट्विट करत, "तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे सोमवारी सकाळी आठ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणे अपेक्षित होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली. या सरकारला काही गांभीर्य आहे की नाही? यात काही काळंबेरे आहे?" असा आरोप करत सरकारच्या कारभाराचा पवारांनी समाचार घेतला आहे.

तलाठी परीक्षेत झालेल्या गोंधळाअडून शासन बेरोजगारांचे शोषणच करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवरांनी केला आहे. ते म्हणाले, सर्व्हर डाऊनमुळे या परीक्षा वेळेत झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी नव्याने शुल्क घेता कामा नये. मुलांच्या प्रवासाची सोयही सरकारनेच करावी. राज्यात फक्त तमाशा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात फी घेऊनही मुलांना सर्व्हर डाऊनच्या नावाखाली परीक्षा देता येत नसेल तर जमा केलेले पैसे कुणाच्या खात्यावर गेले. यातून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल", असा इशाराही वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT