Jayant Patil- Vishwajeet Kadam
Jayant Patil- Vishwajeet Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदम यांची कसोटी; राष्ट्रवादीनेच केलीय गंमत

सरकारनामा ब्यूरो

कडेगाव : येथील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागासाठी आज चुरशीने मतदान झाले. राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे हे गाव असल्याने येथे काय होणार, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने येथे स्वतंत्र पॅनेल टाकल्याने काॅंग्रेससमोर आव्हान निर्माण झाले होते.

नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना होत आहे. पहिल्या टप्प्यातील १३ प्रभागातील मतदान प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी पार पडली असून उर्वरित चार प्रभागासाठी आज मतदान झाले.

या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस येथे निवडणूक लढवत असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे तर भाजपा व राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येथे मोठी चुरस वाढली आहे. मतदान सुरू झाल्यापासून प्रत्येक पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती.प्रत्येक कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत होते. तर मतदानावेळी मतदारांतही मोठा उत्साह दिसून आला. नगरपंचायत निवडणुकीत कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या तिरंगी लढतीमुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. यामुळे मतदान केंद्रासमोर तिन्ही बाजुने मतदान खेचण्यासाठी चढाओढ दिसत होती.

नेतेमंडळींच्या मतदान केंद्राला भेटी
दरम्यान, आज मतदानादिवशी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड आदी नेतेमंडळीनी मतदान केंद्राला भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.तर नगरपंचायत निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

दुपारी दीड वाजेपर्यंत ५०.८७ टक्के मतदान पार पडले. यामध्ये दोन हजार ९७८ मतदारापैकी एक हजार ५१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष ७६४ तर ७५२ महिला मतदारांचा समावेश आहे.

आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. थंडीच्या वातावरणामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही. परंतु अकरानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. सकाळी साडे अकरापर्यंत ३० टक्के मतदान झाले. यामध्ये ८६८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT