CM Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahabaleshwar ST News: 'एसटी'चे वरिष्ठ अधिकारीच पाळेनात मुख्यमंत्र्यांचा आदेश; काय आहे प्रकरण...?

Umesh Bambare-Patil

-रवीकांत बेलोशे

Mahabaleshwar News : महाबळेश्वर आगाराला तातडीने दहा गाड्या द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचा आदेश पाळायला 'एसटी'चे अधिकारी तयार नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतःच्या तालुक्यात पुरेशा गाड्या नसल्याने महाबळेश्वर आगाराला नाशिक, मुंबईसारख्या फेऱ्याही रद्द ठेवाव्या लागत आहेत.

महाबळेश्वर तालुका Mahabaleshwar taluka हा राज्यातील सर्वात दुर्गम तालुका असून, कोयना, सोळशी, कांदाटी या दुर्गम विभागातील नागरिकांना दळणवळणासाठी एसटी बसशिवाय पर्याय नाही. महाबळेश्वर आगारातील गाड्यांचे आयुर्मान संपले असून, गेल्या दहा वर्षांपासून महाबळेश्वर आगाराला एकही नवीन गाडी मिळालेली नाही. हा तालुका मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांचा आहे.

यापूर्वीच्या काळी सातारा विभागात ज्यावेळी नवीन गाड्या यायच्या त्यावेळी महाबळेश्वर आगाराला सर्वप्रथम नवीन गाड्या दिल्या जायच्या. महाबळेश्वर हे राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, येथे देशांतून पर्यटक येत असतात. मात्र, महाबळेश्वर आगारातील गाड्यांचे आयुर्मान संपल्याने पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांना खटारा गाडीतून प्रवास करावा लागतो आहे.

सातारा विभागाचे अधिकारीदेखील उत्पन्नात राज्यात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर आगारातील गाड्यांच्या कमतरतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाबळेश्वर आगारात गाड्या कमी असल्याने प्रवाशांना समाधानकारक सेवा मिळत नाही. स्थानिक शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने महाबळेश्वर आगाराला किमान दहा नवीन गाड्या द्याव्यात, अशी मागणी केली होती.

या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने महाबळेश्वर आगाराला दहा गाड्या द्याव्यात, असे आदेश एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचा आदेश पाळायला एसटीचे अधिकारी तयार नसल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतःच्या महाबळेश्वर तालुक्यात पुरेशा गाड्या नसल्याने महाबळेश्वर आगाराच्या नाशिक, मुंबईसारख्या फेऱ्याही रद्द ठेवाव्या लागत आहेत. अपुऱ्या गाड्यांमुळे शालेय विद्यार्थी, चाकरमानी व दुर्गम भागातील प्रवासी यांना दररोज अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव सुरू झाल्याने मुंबईकर चाकरमानी गावाकडे मोठ्या संख्येने आलेले आहेत.

गणेशोत्सवात तरी नवीन गाड्या मिळतील, अशी अपेक्षा स्थानिक प्रवासी व चाकरमानी यांना होती. मात्र, नवीन गाड्या न आल्याने दुरवस्था झालेल्या गाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. एसटीचे वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांचा आदेश पाळत नसल्याने या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT