Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar: राज्य सरकार कधीही कोसळू शकतं ! रोहित पवारांनी सांगितलं कारण

सरकारनामा ब्युरो

Baramati News: सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि बाजारभावाचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यावर शिंदे-फडणवीस सरकार वारंवार नाफेडने खरेदी सुरू केल्याचे सांगतात, मात्र तशी कोणतीही कार्यवाही सुरू झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांचा घेरताना दिसत आहेत.

राज्यात अनेक प्रश्न असतानाही मंत्रीमंडळाचा विस्तार करीत नसल्याचा आरोपही सरकारवर होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल, असे विधान केले आहे.

बारामती (Baramati) येथे रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "शिवसेना आणि भाजपमधून मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी सरकार धजावत नाही. याचा परिणाम राज्यातील अनेक योजनांवर झाला आहे. मंत्री नसल्याने योजना अडकून पडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या बजेटमधील निधीसुद्धा अजून खर्च झालेला नाही."

राज्यात झालेल्या विधानपरिषद (MLC) आणि पोटनिवडणुकीचा (By-Election) निकाल शिंदे-फडणवीस सरकारविरोधात गेला आहे. त्याचा परिणाम सरकारवर होण्याची शक्यताही पवार यांनी यावेळी वर्तवली आहे. रोहित पवार म्हणाले, "राज्यातील पोटनिवडणुकींचा निकाल हा शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात लागला आहे. तसेच निवडणूक आणि सरकारबाबत जे सर्व्हे येत आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात जात असल्याचे दिसून येत आहे. मंत्रीमंडळ विस्तारातील अडचण आणि नागरिकांची भावना व सर्वे पाहता हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही"

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरू आहे. त्यावरूनही रोहित पवारांनी भाजपचा समचार घेतला. पवार म्हणाले, "राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ यांच्या पत्नी आता आम्हाला गोळ्या घाला, असे म्हणत असतील, तर देशात ईडी, सीबीआयचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. लोकशाहीत स्वायत्त संस्थांचा गैरवापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे. कोल्हापूरातील पोटनिवडणुकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना भाजपला सहकार्य केले नाही, तर ईडीचा वापर करू, असे सांगितले होते. यावरूनच भाजप विरोधकांच्या नेत्वर कारवाया करीत आहे. त्यातून सरकारची घमंडी दिसून येते."

कुटुंबीयांना त्रास देऊन सरकार विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. तशीच घटना आज कागल येथे घडली. त्यावर रोहित पवार म्हणाले, "मुश्रीफ यांच्या घरी अनेकदा छापे मारले आहेत. यात अधिकाऱ्यांची चूक नसते. राज्य सरकारमधील काही लोक केंद्राला सांगून या ईडी, सीबीआय या संस्थाचा गैरवापर करतात. त्यातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र चूक केली नसतानाही तुमच्या वारंवार छापे टाकून त्रास दिला जात असेल, तर कुटुंबाची मानसिकता काय होत असेल? मुश्रीफ यांच्या पत्नीने व्यक्त केलेली भावना अतिशय दुःखद आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT