Chandrdeep Narke- prakash Abitkar-k.p. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha : नरके, पाटील, आबिटकरांसाठी लोकसभेचा निकाल धोक्याची घंटा, विधानसभेला नाकातील मोती होणार जड !

Chaitanya Machale

Kolhapur Lok Sabha News : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे डोळ्यासमोर दिसण्यास सुरवात झाली आहे. शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील विधानसभा निहाय पडलेले मतदान पाहता काही मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामध्ये राधानगरीत आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, करवीरमधील माजी आमदार चंद्रदीप नरके समावेश आहे. लोकसभेचा निकाल पाहता या तिघांसाठी विधानसभा सोपी नसल्याचे संकेत आहेत. शिवाय महायुतीतील अनेकजण इच्छूक असल्याने नाकातील मोतीचं जड जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निकालानंतर अपेक्षित प्रमाणे मंडलिक यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळण्याचा अंदाज होता. मात्र राधानगरी विधानसभा मतदारसंघातून दोन नंबरची मताधिक्य शाहू महाराज छत्रपती यांना मिळाले.जवळपास 64 हजाराची मताधिक्य एकट्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार आबिटकर, माजी आमदार के. पी. भाजपचे (Bjp) माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई एकत्र असून देखील प्रा.मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली तर या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कोणाला तारणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवाय काँग्रेसकडून ए. वाय. पाटील यांनी मैदानात शब्द ठोकला तर आबिटकर किंवा के पी पाटील यांचा राजकीय गेम होऊ शकतो.

शाहू महाराज यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा करवीर विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा आहे. जवळपास 71 हजाराची मताधिक्य पाटील यांनी शाहू छत्रपती यांना दिले आहे.पी.एन.पाटील यांचे अकाली निधन, त्यातून मिळणारी सहानुभूती आणि लोकसभेतील शाहू महाराज यांचे मताधिक्य पाहता या मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभा सोपी वाटत नाही. शिवाय जनसुराज्य कडून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तयार करत असलेले संताजी घोरपडे याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत नरके आणि घोरपडे यांच्यातच रसिकेच असणार आहे.तिरंगी लढत झाल्यास पाटील गटाची सत्ता अबाधित राहणार यात शंका नाही.

घाटगे-मुश्रीफ यांचीही कसोटी

कोल्हापूरच्या राजकारणात आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्येक निवडणुकीत गटातटाला अधिक महत्व आहे.हे वेळोवेळी सिद्ध होत आले आहे.पक्षापेक्षा इथे गटाला स्थानिक गटाला प्राधान्य दिले जाते.कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ व भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांचा व्यक्तीगत गट आहे. घाटगे-मुश्रीफ लोकसभेला एकत्र असले तरी दोघांच्या दृष्टीने विधानसभा सोपी नसल्याची चाहूल या लोकसभेच्या निकालानिमित्ताने लागली आहे. या मतदारसंघातील माजी आमदार संजय घाटगे विधानसभेला काय करणार? त्यांचे पुत्र अमरीश घाटगे यांची भूमिका काय असणार? यावरच घाटगे आणि मुश्रीफ यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT