Ajit Pawar
Ajit Pawar google
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री बांधावर का नाहीत? अजित पवारांनी दिले सविस्तर उत्तर!

उमेश बांबरे :सरकारनामा

सातारा : पूरपरिस्थितीची पहाणी केली म्हणजेच सगळे कळते असे समजू नका, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी जाऊन पहाणी केलेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तेथे पहाणीसाठी गेल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यामुळे त्यांचे अख्ख्या दिवसांचे काम पूर्णपणे बुडते. सगळ्यांचा लवाजमा घेऊन तेथे जाऊन चालत नाही. मुंबईत बसूनच निर्णय घ्यावे लागतात. पहाणी करायचे तेथे जाऊन पहाणी करूच, असे प्रतिउत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना दिले.

मराठवाड्यातील पूरपरिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे. पण या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गेलेले नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. याविषयी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, पहाणी केली म्हणजेच सगळे कळते असे समजू नका. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत, आजही काही मंत्री तेथे गेले असून त्यांच्याकडून आम्हाला सर्व माहिती मिळत आहे.

तसेच मंत्रालयात बसून आम्ही रोजच्या रोज व्हीसी घेऊन जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांशी बोलून सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे. शेतक-यांना मदत पाहिजे, पिके पाण्याखाली गेली आहेत त्यांना मदत हवी आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील येथे गेले आहेत. तसेच शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोकराव चव्हाण, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री तेथे गेले असून त्यांनी पहाणी केलेली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तेथे पहाणी करायला गेल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यामुळे संपूर्ण दिवसांचे त्यांचे काम पूर्णपणे बुडते. त्यामुळे मीडियाने आमच्या पहाणी विषयी गैरसमज पसरवू नये. जेथे पहाणी केली पाहिजेत तेथे जाऊन आम्ही ती करू. मुंबईत बसून काही निर्णय घ्यावे लागतात. त्यानुसार आम्ही मदतीबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

संसर्ग रोखण्यासाठीच नगरमध्ये गावबंदी...

नगर येथे 61 गावात लॉकडाऊन केले असून ही तिसरी लाट आहे का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, नगरला लागूनच पुणे व नाशिक जिल्हा आहे. कोरोनाची साथ कंट्रोलमध्ये असून नगरमध्ये पेशंट वाढल्याने याचा फटका शेजारच्या जिल्ह्यांना बसू शकतो. म्हणून आम्ही गांभीर्याने घेतले. पुण्यातील रूग्णालयात शंभर टक्के पेशंटपैकी ४० टक्के नगरचे पेशंट आहेत. संगमनेर तालुक्यात अधिक पेशंट आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात, निलेश लंके यांनीही यामध्ये लक्ष घातले आहे. या सर्वांनी निर्णय घेतला म्हणून गावबंदी केली आहे. यातून बाहेर ही जायचे नाही आणि आतही जायचे नाही. एकमेकांना भेटल्यानेच कोरोनाचा सर्वाधिक प्रसार होतो. खबरदारीचा उपाय म्हणून गावबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT