Ajit Pawar, Jayant Patil and Chandrakant Patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP-BJP Political War : प्रवेश केलेले तीन आमदार राष्ट्रवादीसाठी बूस्टर, मात्र अजितदादांचा खरा धक्का कोणाला? भाजप की शरद पवारांना

Ajit Pawar, Jayant Patil and Chandrakant Patil : शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये आणण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

Aslam Shanedivan

सांगली : विष्णू मोहिते

जिल्ह्यातील तीन माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख व शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे काय पडसाद उमटतात, याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वसामान्य कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. यामुळे पक्ष बांधणीला देखील वेग आला आहे. यात सध्याच्या घडीला सांगलीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फायदा होईल, असे मानले जाते आहे.

नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदारांपैकी जगताप थेट भाजप तर नाईक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधून अजित पवार गटाकडे आलेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून देशमुख भाजपात होते. विधानसभेला बंडखोरी करून ते महायुती उमेदवारांविरोधात लढले होते. नाईक यांना पक्षात घेऊन अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला म्हणजेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का दिल्याचे मानले जाते. यामुळे सध्या जिल्ह्यासह राज्यात यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे.

या तीन माजी आमदारांचा राजकीय इतिहास पाहता ते पाच-दहा वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट आहे. भाजपलाही फार मोठा धक्का बसला असे नाही, कारण भाजपकडे माजी तीन आमदारांपेक्षा कितीतरी पट जादा ताकदीचे कार्यकर्ते, आमदार त्यांच्या विधानसभा मतदार संघात आहेत.

माजी मंत्री नाईक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून अजित पवारांकडे गेले. त्या शिराळा तालुक्यात माजी आमदार नाईक गट, विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाजपकडे आहेत. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. त्यानंतर भाजपकडून गोपीचंद पडळकर विधानसभेला निवडून गेले. माजी आमदार देशमुख यांच्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर ताकदीने सरस आहेत.

माजी आमदार नाईक 1995 मध्ये अपक्ष म्हणून लढले. जिंकलेही. ते तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. नाईक 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपकडून विजयी झाले. 2019 मध्येही भाजकडूनच निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. तर आताही ते भाजपमध्येच कार्यरत होते.

पण 2024 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला निकालानंतर अवघ्या काही महिन्यातच राष्ट्रवादी (अजित पवार गट) त प्रवेश केला आहे. माजी मंत्री नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दोन वर्षे राहिले. त्यांच्या पक्ष बदलाचा फारसा परिणाम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर होईल असे वाटतं नाही.

जतचे माजी आमदार जगताप यांच्याबाबतही अशीच स्थिती आहे. जगतापही 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपकडून आमदार झाले. 2019 मध्येही भाजपकडून लढले. मात्र पराभूत झाले. यानंतर ते भाजपमध्ये कार्यरत होते. पण ऐन 2024 मध्ये लोकसभेच्या तोंडावर उमेदवारीवरून त्यांचे आणि भाजपचे बिनसले. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना विरोध केला.

अंतर्गतविरोध मतदार संघात बिघडलेली छबी यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यानंतरही जगताप भाजपसोबतच होत. हाच विरोधाचा कित्ता त्यांनी विधानसभेला गोपीचंद पडळकर यांच्याबाबत गिरवला. भाजपचे उमेदवार देऊनही ते स्वत: अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवले. त्यानंतरच भाजपने थेट कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबीत केले. पण ऐवढ्यावर शांत होणारे जगपात कसले? त्यांनी निलंबन करणाऱ्या भाजपलाच दोन बोल सुनावत मी आधीच पक्षाचा राजीनामा दिला आहे. मग कसलं निलंबन करता असा उलटा सवाल केला होता. यामुळे देखील ते चर्चेत आले होते. तर काही महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

माजी आमदार देशमुख 2019 पूर्वी राष्ट्रवादीत होते. नंतर त्यांनी भाजपशी घरोबा केला. काही वर्षात ते भाजपमध्ये सक्रिय होते. 2024 च्या विधानसभेवेळी त्यांना भाजपने उमेदवार दिली नाही. खानापूर आटपाडी मतदार संघात शिवसेनेकडे असल्याने भाजपने देशमुखांचा विचारच केला नाही. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी आपला मोर्चा शरद पवार गटाकडे वळवत नेत्यांशी चर्चा केली. मात्र तिथेही उमेदवारी मिळाली नाही. अखेर अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला. आता ते अजित पवार गटात गेले आहेत. नाईकयांचा दोन वर्षाचा कालावधी वगळता ते जगताप व देशमुख तिघेही भाजपमध्ये सक्रिय होते.

चंद्रकांतदादांच्या भूमिकेकडे लक्ष

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचे जिल्ह्याचे पालक म्हणून पाहिले जाते. शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये आणण्यात त्यांचे योगदान आहे. या नेत्यांमुळे भाजपची वाढली. जगताप, देशमुख यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT