Baba Bhand
Baba Bhand Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक सुधारणा टिळकांना आवडत नव्हत्या...

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर येथील स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानतर्फे शिक्षण महर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार सोहळा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी बोलताना बाबा भांड यांनी राजे सयाजीराव गायकवाड यांचे ऐतिहासिक कार्य सांगताना त्यांचे कार्य दुर्लक्षित ठेवण्यात आल्याचा आरोप केला. ( Tilak did not like Sayajirao Gaikwad's social reforms ... )

साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, विवेक भापकर, सीताराम खिलारी, मुकेश मुळे, कवी चंद्रकांत पालवे आदी उपस्थित होते.

बाबा भांड म्हणाले, कला, साहित्य, संस्कृती या देशाचा वारसा जपतात. वारश्याकडे इतिहासाच्या माध्यमातून दुर्लक्ष होत आहे. बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी सर्वक्षेत्रात काम केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदे आदी विषयांचे तज्ज्ञ शाहू-फुले-आंबेडकरांच्या बाहेर जायला तयार नाहीत. सयाजीराव गायकवाड यांचे काम मोठे आहे. त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली. त्याचे आजचे मूल्य कोटीच्या घरात आहे. स्वामी विवेकानंदांनी पहिल्या जागतिक धर्म परिषदेत केलेले भाषण सगळे सांगतात. मात्र दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेत सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते हे कोणी सांगत नाही. इतिहास एकांगी अभ्यासाने मांडला जात आहे. त्यामुळे भांडणे होत आहेत. इतिहास एकांगी नसावा.

ते पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी बऱ्याच सामाजिक सुधारणा बडोदा संस्थानच्या पाहूच केल्या आहेत. शाहू व सयाजीराव यांचा इतिहास जोडून लिहिला पाहिजे. सयाजीराव गायकवाड यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 8 वाक्यांचे पत्र लिहिले हे पत्र अभ्यासण्याजोगे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक कार्य केले ते सर्व सयाजीराव गायकवाडांनी आधीच केले होते. सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानात धर्मखाते काढले होते. युरोप व अमेरिकेच्या आधी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. मुलींचे शिक्षण त्यांनी सक्तीचे केले होते. सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा बाळ गंगाधर टिळकांना आवडत नव्हत्या. राजवाडेंनाही त्यांच्या सुधारणा आवडत नसल्याचे मत बाबा भांड यांनी व्यक्त केले.

आशिया खंडातील पहिली सहकारी संस्था सयाजीराव गायकवाड यांनी सुरू केली होती. मात्र सहकारी संस्थांतील नेते सांगत नाहीत. त्यांनी 150 वर्षापूर्वी 1800 ग्रंथ प्रकाशित केले. 185 शैक्षणिक संस्थांना मदत केली. अनेक विद्यार्थांना शिष्यवृत्त्या दिल्या. सयाजीराव गायकवाड देशातील इतर राजांसारखे इंग्रजांचे मांडलिक राजा नव्हते. त्याचे पुरावेही आहेत, असेही त्यांनी सांगितले.

माहेलका पुस्तकाला पुरस्कार

या वेळी दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक अशोक निंबाळकर लिखित माहेलका कादंबरीला 2022 सालचा शिक्षण महर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुस्तकाचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मेधा काळे व प्रा. बापू चंदणशिवे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT