सयाजीराव गायकवाड - आंबेडकरांच्या एकत्रित जेवणाची बातमी न्यूयॉर्क टाईम्सने केली होती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे संपूर्ण आयुष्यचा प्रवासच जगाला प्रेरणा देणारा आहे. पण त्यातही त्यांचा अतिशय संघर्षातून तत्कालीन प्रस्थापित समाजव्यवस्थेला व्यवस्थेला फाटा देत विद्यार्थीदशेत शिक्षणासाठी प्रतिष्ठीत लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये (London School of Economics and Political Science) जाणं आणि तिथल्या अभ्यासातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हा प्रवास जास्त प्रेरणादायी आहे. डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या या प्रवासात सर्वात जास्त मदत झाली ती बडोदा संस्थानचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaikwad) आणि कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Shahu Chhatrapati Maharaja) यांची.
मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधील शिक्षणानंतर १९१२ साली एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ याठिकाणांहून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात बी.ए.ची पदवी घेतलेले ते पहिले बहुजन समाजातले व्यक्ती होते. याच दरम्यानच्या काळात बडोदा संस्थानचे महाराज होते तिसरे सयाजीराव गायकवाड. त्याकाळातील अत्यंत पुरोगामी विचारसरणीचे राजे म्हणून सयाजीराव गायकवाड यांना ओळखलं जात होते. समजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून त्यांनी खूप मोठे काम हाती घेतले होते.
महाराज गायकवाड यांनी त्यावेळी प्रतिभावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकण्याची ओढ पाहून त्यांना आधी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि नंतर ब्रिटनस्थित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देवू केली. या शिष्यवृत्तीच्या मदतीने आंबेडकर यांनी परदेशातील शिक्षणाची सुरुवात केली. १९१५ मध्ये त्यांनी पदविका मिळवली आणि १९१६ साली "नॅशनल डिवीडेंट ऑफ इंडिया-ए हिस्टोरिक अँड ऍनालीटीकल स्टडी" हा शोधप्रबंध पूर्ण केला. मात्र भारतीय वित्त आणि चलन विषयी संशोधन करण्यासाठी त्यांना लंडन शहरात जावून अभ्यास करण्याची इच्छा होती. कारण या संशोधनासाठी लागणारे साहित्य आणि संशोधन साधन सामग्री तिथे सहज उपलब्ध होणार होती.
१९१६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे दाखल झाले आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एल.एस.ई.) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पदवी घेतली. मात्र याच काळात पहिल्या महायुद्धाच्या संकटामुळे त्यांना फार दिवस लंडन शहरात वास्तव्यास थांबता आले नाही. पहिल्या महायुद्धाच्या सावटामुळे त्यांना बडोदा संस्थानमध्ये सैन्य सचिव म्हणून बोलावण्यात आले. यानुसार त्यांनी अभ्यास थांबवून जुलै १९१७ मध्ये लंडन विद्यापीठातून चार वर्षांसाठीची अनुपस्थिती रजा मंजूर करवून घेतली आणि मायदेशी परत आले. त्यांनी या कालावधीत काही दिवस मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले.
पुढे पहिले महायुद्ध निवळल्यानंतर कोल्हापूर संस्थानच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज व इतर काही लोकांच्या सहकार्यांने डॉ. आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधील अर्धवट सोडावे लागलेले पदव्यूत्तर शिक्षण आणि भारतातील प्रांतीय विकेंद्रीकरणाचा अभ्यास यावर शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी अर्ज केला आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी' हा डॉक्टरेटसाठीचा शोधप्रबंध त्यांनी मार्च १९२३ मध्ये पूर्ण केला. सुरुवातीला परिक्षकांना हा प्रबंध ब्रिटीशविरोधी वाटल्यामुळे तो मान्य करण्यात आला नाही. पण आंबेडकर यांनी हार न मानता ऑगस्ट १९२३ मध्ये पुन्हा सादर केला आणि नोव्हेंबर १९२३ मध्ये तो स्विकारण्यात आला. पुढे याच प्रबंधाच्या आधारे भारतात १९३५ साली "रिझर्व बँक ऑफ इंडिया" ची स्थापना झाली.
याच काळात डॉ. आंबेडकर यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत अनेक विषयात पदवी पूर्ण केली. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी लंडनमधून एम. एस. स्सी (MSc) आणि डी. एस. सी (DSc) पदवी मिळविली. याशिवाय नाणे विषयक धोरण, वित्तीय धोरण अशी दोन प्रमुख आणि आणखी एक अशी तीन पुस्तकं प्रकाशित केली. यांच्या आधारावरच कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी.एचडी. देवू केली. या दरम्यान आंबेडकर यांनी वकील म्हणून व्यवसायिक पात्रता संपादन करत ग्रेज इन या प्रसिद्ध व प्रतिष्ठीत बार कौन्सिलची सदस्यत्वही मिळवले होते. पुढे ते पुन्हा मायदेशी परत आले
जगप्रसिद्ध दैनिक ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ मधील एका लेखानुसार, १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी पुन्हा लंडनला गेले. याठिकाणी त्यांनी आपल्या अफाट बौद्धिकतेच्या जोरावर गोलमेज परिषदेत अत्यंत प्रभावी भाषण केले, ज्याचे अनेक खुप कौतुकही झाले. इंडियन डेली मेल या वृत्तसंस्थेने त्यांच्या वक्तृत्वाचे 'सर्वोत्कृष्ट वक्तृत्व' म्हणून वर्णन केले. डॉ. आंबेडकर यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्यांपैकी या संमेलनातील एक व्यक्ती होती ती म्हणजे बडोदा संस्थानचे राजा तिसरे सयाजीराव गायकवाड.
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यावेळी आपल्या पत्नीला डॉ. आंबेडकरांच्या महानतेबद्दल, त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेबद्दल प्रशंसा केली आणि त्यांनी दिलेली शिष्यवृत्ती ही खुपच पात्र अशा व्यक्तीला दिली गेली याबद्दल समाधानही व्यक्त केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना एकदा रात्र भोजनासाठी हायड पार्क या लंडनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये खास आमंत्रित केले. या रात्रीच्या भोजनाबद्दल “द न्यू यॉर्क टाइम्स” या प्रसिद्ध दैनिकात एक लेख छापला गेला, ज्याचे शीर्षक होते, “Prince and outcast at dinner in London end age-old barrier” म्हणजेच “सर्व जुन्या चालीरितींना मुठमाती देत एक राजकुमार आणि दलित मेजवानीसाठी सोबत”.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.