Kolhapur Vidhan Sabha  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत फाईट; विधानसभेला उमेदवारीवरून नेत्यांची डोकेदुखी वाढणार

Rahul Gadkar

Kolhapur Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण मैदानात शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील काही नेते आणि इच्छुकांनी तयारी सुरू ठेवली आहे. सध्या महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे.

मात्र, स्थानिक पातळीवरील नेते ज्या पद्धतीने लोकसभेला एकत्र आले त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत एकत्र येतील याची शक्यता फार कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. हातकणंगले, राधानगरी, कोल्हापूर उत्तर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) उत्तरमधून महाविकास आघाडीकडून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती किंवा त्यांच्या पत्नी मधुरिमा राजे छत्रपती या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, आमदार जयश्रीताई जाधव यादेखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ऐनवेळी लोकसभेतील एक इच्छुक आणि ऐनवेळी माघार घेतलेल्या उमेदवाराचे नाव पुढे येऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडीकडे वाटचाल सुरू केलेल्या ए. वाय. पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या मार्गात माजी आमदार के पी पाटील हे अडचण निर्माण करू शकतात. लोकसभेच्या निकालानंतर जनतेचा कौल पाहताच के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळातच नेमके चित्र स्पष्ट होईल.

चंदगड विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीकडे असल्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्याकडेच राहील. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अमर चव्हाण यांनी शरद पवार यांचा गड सांभाळला. मात्र, लोकसभेच्या निमित्ताने बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर पुन्हा सक्रिय झाल्याने उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. तर मागील दोन विधानसभा निवडणुकीत आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून अप्पी पाटील यांनी लक्षवेधी मते घेतली होती. त्यांनी आता कॉँग्रेस प्रवेश केला आहे. तसेच गोपाळरावही सध्या काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे मतदारसंघाची अदलाबदल करून या जागेवर काँग्रेसकडनही दावा केला जाऊ शकतो.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे हे देखील पुन्हा या जागेसाठी दावा करू शकतात. तर महाविकास आघाडी मधील माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना ठाकरे गटाचे सुजित मिणचेकर देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची रेस कोण जिंकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT