MP Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
MP Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे संतप्त : राज्यपालांनी ते वक्तव्य मागे घ्यावे

सरकारनामा ब्युरो

सातारा : औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत असून राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले होते. या वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खासदार उदयनराजे यांनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय की, 'राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय.' त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. 'त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं,' असे आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिला आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी...

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी म्हणाले, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागं आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की, तुमच्या कृपेनं मला राज्य मिळालं आहे. आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळं मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले; पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सद्गुरूकडे मिळतो, असंही कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT