Udayanraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale Statement : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? खासदार उदयनराजेंनी दिलं 'हे' उत्तर

Deepak Kulkarni

Satara News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीनंतर विजयाचा गुलाल उधळण्यास आणि फटाके फोडण्यास सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. तसेच 23 नोव्हेंबरला राज्यात कुणाचं सरकार येणार यावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे.

त्यातच आता आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जाणारे साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार यावर मोठं विधान केलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी (ता.17) आपल्या खास शैलीत मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, विरोधक योजनांवर टीका करत आहेत, कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत. जर ते योजनांना नावं ठेवत आहेत तर त्यांनी नव्या योजना का आणल्या नाही? स्वतः कुठल्या योजना आणायच्या नाहीत. दुसऱ्याने आणल्या तर त्याला नावं ठेवायची आणि टीका करत बसायची एवढंच यांना जमतं असा टोलाही उदयनराजेंनी यावेळी लगावला.

तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा फुल स्विंग आणि फुल स्विपध्ये महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार आहे. आम्ही आमचं काम करत असून आपण आणि शिवेंद्रराजेंनी अनेक कामं मार्गी लावली आहेत. आमचं काम हाच आमचा अजेंडा आहे असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचवेळी जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात मी फिरणार असून जिथे गरज लागेल, तिथेही प्रचाराला जाणार आहे, असंही मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.

...म्हणून पवारांचे दौरे वाढले!

भाजप खासदार उदयनराजे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवारांनी कामं केली असती, तर त्यांना ती सांगता आली असती. पण, ती नाहीत म्हणून त्यांना दौरे वाढवावे लागत आहेत.महायुतीने रिपोर्ट कार्ड आणलं आहे, कारण महायुतीने कामं केली आहेत.यांनी काही कामंच केलेली नसल्यामुळे हे टीका करत आहेत, असा हल्लाबोलही उदयनराजेंनी यावेळी केला.

याचवेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न शरद पवारांच्या हातात होता तेव्हा त्यांनी तो का सोडवला नाही? मराठा समाजाला न्याय का दिला नाही? तसेच 23 मार्च 1994 च्या नोटिफिकेशवर ते भाष्य का करत नाहीत? असा तिखट सवाल करतानाच आपण हे सगळं मनोज जरांगेंना समजावूनही सांगितल्यांचही ते म्हणाले.पण त्यांनी आणि इतरांनी हा विषय राजकीय केला, असा घणाघातही उदयनराजेंनी यावेळी केला.

लोकसभेला विरोधकांनी नरेटिव्ह सेट केलं होतं की, 400 पार गेले तर संविधान बदलतील. संविधान कसं काय कुणी बदलेल? अशी विचारणाही खासदार उदयनराजेंनी यावेळी विरोधकांना केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT