Makarand Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : भाजप अन् शरद पवारांच्या पक्षाचा डाव मकरंदआबांनी उलटवला! बावधनमध्ये राजकीय उलथापालथ

NCP News : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा मंत्री मकरंद पाटील यांनी बाजी मारली आहे.

Hrishikesh Nalagune

NCP News : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा मंत्री मकरंद पाटील यांनी बाजी मारली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनेलने उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव एका सदस्याच्या अनुपस्थितीमुळे नामंजूर झाला. सदस्यांची आकडेवारी पूर्ण न झाल्याने उदयसिंह पिसाळ हे चालू काळात पुन्हा उपसरपंच म्हणून कायम राहिले आहेत.

स्थानिक पातळीवर राजकारण करण्यासाठी बडे बडे नेते स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशात बावधन सारख्या सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ सुरु होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनेलच्या 13 सदस्यांनी उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे मंत्री मकरंद पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता होती.

उपसरपंच उदयसिंह पिसाळ हे गेले अनेक दिवस इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी तसेच गावातील इतर निर्णय हे बाकी सदस्यांना विचारात न घेता देत असल्यामुळे सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यामधे कोणत्याही प्रकारे ऐकोपा राहत नाही. हे वर्तन ग्रामपंचायत कामकाजास बाधित ठरत आहे, असे दाखल ठरावात म्हंटले होते. ठराव दाखल होताच कोणताही हलगर्जीपणा न ठेवता मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनेलमध्ये राजकीय डावपेच खेळणे सुरु झाले.

माजी सरपंच शुभांगी कांबळे यांनी देखील या ठरावास पाठिंबा देत स्वाक्षरी केली होती, परंतु; मतदानादिवशी अचानक त्यांनी बाजू पालटून उदयसिंह पिसाळ यांना पुन्हा पाठिंबा दर्शविला. त्या या बैठकीस गैरहजर राहिल्या, त्यामुळे सदस्यांची पुरेशी बेरीज न झाल्याने हा ठराव ना मंजूर करत उदयसिंह पिसाळ यांची पुन्हा उपसरपंच पदी कायम निवड करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री मकरंद पाटील गटाचे वर्चस्व बावधन ग्रामपंचायतीवर असल्याचे दिसून आले आहे.

शुभांगी कांबळे यांची चार वर्षातील दुसरी पलटी :

शुभांगी कांबळे यांची चार वर्षातील ही दुसरी पलटी ठरली आहे. 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने 9 आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पॅनेलने 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे काठावरचे बहुमत होते. अशात सरपंच असलेल्या शुभांगी कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ग्रापंचायतच भाजपच्या ताब्यात गेली होती. पण दुसऱ्याच दिवशी कांबळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्याच शुभांगी कांबळे यांनी एका रात्रीत पलटी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT