Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

'उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि 39 आमदार जे म्हणतात तसे करावे'

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्री सिद्धविनायक गणपतीचे दर्शन व वडारवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त केले. Ahmednagar BJP News Update

तसेच अंबालिका बारडगाव सुद्रिक येथे विविध कार्यकारी सोसायटी च्या नुतन सदस्यांचा सत्कार व शिबस्मित मल्टि स्टेट चा शुभारंभ खासदार डॉ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. सुनील गावडे, अशोक खेडकर, शांतिलाल कोपणर, दादासाहेब सोनमाळी, एन. एस. पाटील, नितीन लोंढे, गोकुळ पवार, तात्यासाहेब माने, सह परिसरातील ग्रामस्थ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याच्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर गणपतीला तुम्ही काय मागितले असे विचारले असता डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, राज्यपाल निर्णय घेतील त्या नुसार बहुमत सिद्ध करण्यासाठीची रणनीती विधानसभेच्या पटलावर ठरेल. मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, गोरगरिबांचे व हिंदुत्त्ववादी सरकार येईल, अशी त्यांनी गणपती चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून भाजपला कल दिला होता. यात शिवसेनेने गद्दारी केली म्हणून जनतेने दिलेला कौल राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी आघाडी केली. या आघाडीमध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला गेला. महाराष्ट्रातील जनतेचा स्वार्थ पाहिला गेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर भाजपचे सरकार आले तर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कुकडी आवर्तन देऊ. सत्ता येईल अथवा नाही मात्र आमचा संघर्ष सुरू आहे. राम शिंदे आता आमदार झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष वाढीचे काम चालत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काम शिवसेना संपविण्याचेच होते. हे मी मागील दोन वर्षांपासून सांगत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. पक्षाचे 52 आमदार सोडले, मात्र ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. म्हणून या परिस्थितीमुळेच शिवसेना संकटात आहे. शिवसेनेच्या चुकीमुळेच शिवसेना संकटात आहे. भाजप एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने सामान्य नागरिकांवरील संकटे वाढत असताना राज्यात स्थिर सरकार मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री अल्प मतात असल्याने बहुमत चाचपणीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत आहोत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असला तरी तो निर्णय सर्वांना मान्य आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या बरोबर राहून पूर्णपणे खच्चीकरण झाले. शिवसैनिक हतबल झाले. अजूनही वेळ गेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी आपले रक्त सांडून शिवसेना उभी केली आहे. त्यांनी वर्षानुवर्षांचा त्याग करून निष्ठेने शिवसेना उभी केली आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि 39 शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून ते जसे म्हणतील तसे करावे. अऩ्यथा राहिलेले 10-12 आमदारही उद्या राहतील अशी स्थिती नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजपचा सहभाग नाही

राज्यातील राजकीय परिस्थितीत ऑप्रेशन लोटसचा कुठलाही सहभाग नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी शिवसेनेत झालेला हा बंड आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांनी महाविकास आघाडीचे समर्थन काढल्यामुळे एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने राज्यपालांकडे अविश्वासाच्या ठरावाची मागणी करणे नैतिक अधिकार आहे. त्याचाच वापर करत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांकडे अविश्वास ठराव मांडण्याची मागणी केली. शिवसेनेत अंगर्तग बंडाळी होते. हा शिवसेनेतील अंतर्गत वाद आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. सरकार अल्पमतात आहे की बहुमतात हे लवकरच कळेल. गुवाहाटीला असलेले हे खरे शिवसैनिक आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा व शिवसेनेची स्थापना ज्यासाठी झाली तो विचार पुढे घेऊन जायचा निर्धार केला. अशा शिवसैनिकांच्या पाठिशी मी राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT