Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar News : 'बिबट्या जंगल सोडून पळाला अन् त्याच्यामागे गेंडासुद्धा..' ; उत्तम जानकरांचं कागलमध्ये विधान!

Mayur Ratnaparkhe

Uttam Jankar on Hasan Mushrif : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी डावपेच खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षानेही कोल्हापुरातील कागलमध्ये असाच मोठा डाव टाकला आहे.

या ठिकाणचे भाजपचे दिग्गज नेते समरजित घाटगे(Samarjeetsinh Ghatge) यांना गळाला लावून, भाजपला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत येथील प्रसिद्ध गैबी चौकात जाहीर सभा होवून, यामध्ये समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार उत्तम जानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वच नेत्यांची जोरदार भाषणं झाली. तर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उत्तम जानकरांनीही यावेळी शरद पवारांसमक्ष जोरदार भाषण करत, उपमुख्यमंत्री अजित पवार अन् मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मुश्रीफांनी केलेल्य टीकेला उत्तम जानकरांनी(Uttam Jankar) प्रत्युत्तर दिलं.

उत्तम जानकरांनी टीका करताना सुरुवातीलाच स्पष्ट केले की, माझ्यावर कागलच्या नेत्याने टीका केली, म्हणून मी इथपर्यंत आलोय. जंगलाला आग लागली, बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्याच्यामागे गेंडासुद्धा पळून गेला. असं म्हणत जानकरांनी नाव न घेता अजित पवार अन् मुश्रीफांवर निशाणा साधला.

पुढे जानकर म्हणाले, 'या बहाद्दराला काय दिलं नाही, गोकुळचं दुध प्यायला दिलं, काजू बदाम खायला घातलं, गरीब शेतकऱ्यांना कर्ज मिळावं म्हणून केडीसीसी बँकेच्या चाव्या दिल्या. मात्र या माणसानं भ्रष्टाचार केला म्हणून त्याच्याकडे ईडी आली, पण ईडी आल्यावर पोटासह पळाला. हा माणूस नतदृष्ट निघाला. तसेच, साखर कारखान्याला नुसतं संताजी नाव दिलं, याला भ्रष्टाचारी साखर कारखाना नाव दिलं पाहिजे, असं म्हणत मुश्रीफांच्या(Hasan Mushrif) साखर कारखान्यावरही बोट ठेवले.'

जयंत पाटील काय म्हणाले? -

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी भाषण केले. ते म्हणाले, 'शरद पवार हे स्वतः हे समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी गैबी चौकात उपस्थित आहेत हा कागलच्या जनतेसाठी एक संदेश आहे. घाटगे यांची नवीन सुरुवात इथून सुरुवात होत आहे. राज्यात परिवर्तनाची लाट आहे. मतदार निवडणुकीची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील जनता हुशार आणि चतुर आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्वांचा हिशोब केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांना जागा देखील राहणार नाही.'

तसेच, 'शरद पवार(Sharad Pawar) हे वस्तादाचे वस्ताद आहेत. वस्तादाने एक डाव राखून ठेवलेला असतो. मी जाणाऱ्यांना सांगत होतो जाऊ नका लफडं होईल. त्यांना अंगावर घेण्याचा धाडस करू नका कपाळ मोक्ष होईल हे जाणाऱ्यांना सांगत होतो. काही जणांना वाटतं की संरक्षण होईल, काळाच्या ओघात सर्व निर्णय होत असतात. कायद्याच्या घरी कोणीही जाऊ शकत नाही, कायदा कुणासाठी बदलत नाही. पवार साहेब जहां से खडे होते हे लाईन वहीसे सुरू होती है.'

याशिवाय, 'समरजित घाटगे दहा वर्षे सामाजिक कार्यात आहेत. त्यांनी कारखाना सर्वोत्तम चालवला आहे. सत्ता असो वा नसो स्वाभिमानी बाणा त्यांनी कायम दाखवला आहे. समोरच्या पक्षाला माणसे सांभाळता येत नाहीत त्याला आम्ही काय करणार. कुणीतरी आपल्या पक्षात आले म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडण्याची व्यवस्था समोरच्या पक्षात आहे. घाटगे हे पेशाने सी ए आहेत, त्यांना वजाबाकी चांगली करता येते. हिशोब चोख ठेवणारे घाटगे या मतदारसंघाचा विकास करतील.' असंही यावेळी जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT