shirdi
shirdi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साईमंदिरातील फूलविक्रेत्यांच्या पाठीशी उभे ठाकले विखे : विश्वस्त मंडळाला निर्वाणीचा इशारा

सतीश वैजापूरकर

Shirdi : फूलविक्रेत्यांना साईमंदिरात मागील 10 महिन्यांपासून हार, फुले, प्रसाद विक्रीसाठी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी बंदी केली आहे. ही बंदी उठवावी या मागणीसाठी काल ( ता. 26 ) फूल विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत हार, फुलांसह मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी अडविले होते. पोलिसांच्या मध्यस्तीने हार, फुलांविना त्यांना मंदिरात दर्शन देण्यात आले. या फूलविक्रेत्यांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe ) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe ) यांनी समर्थन दिले आहे.

साईमंदिरात हार आणि प्रसाद नेण्यास घातलेल्या बंदीच्या विरोधात आज फूलविक्रेते आणि फूलउत्पादक शेतक-यांनी हातात फुलांच्या हारांसह दर्शनबारीत शिरून आंदोलन केले. सुरक्षारक्षक आणि आंदोलकांत काही काळ झटापट झाली. या घटनेवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत, फूलउत्पादक शेतकऱ्यांना धमकावणे आणि मारहाण करण्याच्या प्रकाराची आपण गंभीर दखल घेतली आहे, असा इशारा दिला. त्यापाठोपाठ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मारहाण झाली तर आम्ही शांत बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाला दिला. या दोन्ही इशाऱ्यांमुळे येथील वातावरण कमालीचे तापले.

दरम्यान उद्या (ता. २७) मंत्री विखे पाटील यांनी याप्रश्नी येथे बैठकीचे आयोजन केले आहे. त्यातच आज विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हार आणि प्रसादबंदी कायम ठेवावी, अशी मागणी विश्वस्त मंडळाकडे केली. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज दिवसभर याप्रश्नी एका पाठोपाठ एक घटना घडत होत्या. फूलविक्रेते आणि फूलउत्पादक शेतक-यांचे आंदोलन होण्यापूर्वी, या मागणीसाठी माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते दिगंबर कोते हे गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. आज माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनीदेखील, हार-प्रसादबंदी हटवावी, या मागणीसाठी दुसऱ्यांदा सत्याग्रह केला. एका बाजूला या घटना घडत असताना शहरातील विवीध पक्षांचे नेते एकत्र आले. त्यांनी हार-प्रसादावरील बंदी कायम ठेवण्याची मागणी साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या बैठकीत जाऊन केली.

विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णयाचा अधिकार नाही

साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक आज दिवसभर सुरू होती. मात्र, या बैठकीत याप्रश्नी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. एका विश्वस्ताने नाव जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विश्वस्त मंडळाला कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने दिलेला नाही. माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी ही बाब लिखित स्वरूपात आमच्या निदर्शनास आणून दिली आहे. हार आणि प्रसादबंदीचा निर्णय कोविड काळात सरकारी पातळीवर झाला असावा. त्यामुळे आम्हाला त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. आम्ही फक्त त्याबाबतचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे.

साईमंदिरात हार, फुले, प्रसाद नेण्यास असलेल्या बंदीबाबत सर्वांच्या भावना जाणून घेणे गरजेचे आहे. याप्रश्नी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने लोकप्रतिनीधींसोबत चर्चा केलेली नाही. मतदारसंघातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मारहाण झाली तर आम्ही शांत बसणार नाही.

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT