Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विखेंचे संगमनेरमध्ये शक्तिप्रदर्शन : म्हणाले, नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आणि माफीयांना थारा नसेल...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना महसूलमंत्रीपद मिळाले. संगमनेर शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री विखे पाटील यांची मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संगमनेर शहरात भाजपकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी क्रेनद्वारे मोठा हार घालून मंत्री विखेंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ होते. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, जावेदभाई जहागिरदार, उद्योगपती मनीष मालपाणी, अमोल खताळ, डॉ. सोमनाथ कानवडे, शिवाजीराव धुमाळ, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, डॉ. भानूदास डेरे, विक्रमसिंह खताळ सतीश कानवडे, भाजयुमोचे श्रीराज डेरे, दिपेश ताटकर, माजी नगसेविका मेधा भगत, शिरीष मुळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार हे लोकांसाठी काम करणारे आहे. राज्यात पुन्हा विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आणि माफीयांना थारा नसेल, तर सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही निर्णयासाठी आघाडी सरकारचे मंत्री केंद्राकडे बोट दाखवत होते मग मंत्री काय भजे तळत होते का असा सवाल करून मागील अडीच वर्षात जनतेच्या हिताचा एकही निर्णय होवू शकला नाही. पेट्रोल-डिझेल वरील कर कमी न करता या सरकारने दारुचे दर कमी केले. या सरकारमध्ये फक्त वसुलीचा कार्यक्रम सुरू होता.ज्यांना कोणताही निर्णय करता आला नाही तेच आज आम्हांला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी वाचून दाखवत आहे. मात्र हे राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प सरकारने केला असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

कोविड संकटात हा देश फक्त पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयामुळे वाचला. मोफत धान्य मोफत लस देवून कोट्यावधी भारतीयांना दिलासा देण्याचा निर्णय घेत्ल्यामुळेच मोदी विश्वनेता ठरले असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री फक्त लस खरेदी करण्यासाठी साडेसहा हजार कोटीचा धनादेश तयार असल्याचे सांगत बसले परंतू आघाडी सरकारची एवढी पत गेली होती की निविदा भरायला कंपन्या सुध्दा आल्या नसल्याची टिका करून नव्या सरकारने कोव्हीड संकटात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी पर्यतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय केला असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे आश्वासित करून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाकरीता प्रधानमंत्री ग्रामासडक योजना सुरू करताना मागील सरकारच्या काळात फक्त घोषणा झाल्या परंतू अंमलबजावणी नव्हती.मात्र आता लोकांसाठी काम करणारे सरकार आले आहे.आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला नव्हे कामाला प्राधान्य असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

निळवंडे कालव्यांच्या संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पहिल्या 20 किलोमीटर मध्ये कामाची सुरूवात झाल्यामुळे पुढची काम सुरू झाली. अनेक जण आपल्या सह्याचे फ्लेक्सबोर्ड लावून पाणी देणार सांगत होते.परंतू निळवंडे कालव्यांच्या कामाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस आणि मधुकरराव पिचड यांचे असल्याचा आवर्जून उल्लेख करतानाच कालव्याचा कामाचा आढावा घेवून लाभक्षेत्रात पाणी देण्यास सरकार कटीबध्द राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

घरात बंदुका घेवून जाण्याची मुजोरी वाढली

संगमनेर तालुक्यात वाळू माफीयांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सामान्य माणसाच्या घरात बंदुका घेवून जाण्याची मुजोरी वाढली आहे. मात्र आता या वाळू माफीयांचा माजही उतरावा लागेल.यासाठी सरकार महिन्याभरात वाळूचे सर्वकंष धोरण आणणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.अधिकार्यांनी सुध्दा कोणाच्या कार्यालयातून आलेल्या फोनवर काम करण बंद करा. सरकार आता बदलले आहे याची जाणीव ठेवा लवकरच तालुक्यातील प्रश्नसाठी आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेच्या मनातील सरकार

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अनेकांनी उभे राहून प्रश्न मांडायला सुरवात केली. सर्वाचे प्रश्न ऐकून घेत त्यांनी सांगितले की नव्या सरकारचा हा परिणाम आहे. आमच्या सभेत तुम्हांला बोलता येते, इतरांच्या सभेत तुम्हांला बोलू दिले असते काॽ असा प्रश्न करून जनतेच्या मनातील सरकार आहे, असे सांगायला मंत्री विखे पाटील विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT