Sambhaji Raje Chhatrapati- Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Raje Chhatrapati : पालकमंत्र्यांने मला पुरोगामीपणा शिकवू नये, संभाजीराजे मुश्रीफांवर बरसले !

Rahul Gadkar

Kolhapur News : किल्ले विशाळगडावरून सुरू झालेल्या वादावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.

158 पैकी दोनच अतिक्रमणधारकांनी कोर्टात धाव घेतली असताना बाकीचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने विलंब का लावला? असा प्रश्न उपस्थित करत झालेल्या प्रकाराला प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करत त्यांनी पालकमंत्री मुश्रीफांवर सडकून टीका केली.

'इथला पालकमंत्री मला पुरोगामीपणा शिकवत आहे. मला कोट करून बेजबाबदारपणा दाखवू नये. इकडून तिकडून पैसे घेऊन माहिती घेणाऱ्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आम्हाला शिकवू नये' अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती मुश्रीफांवर कडाडले. कोल्हापुरातील (Kolhapur) शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जोरदार टीका केली.

संभाजीराजे म्हणाले, काल जो काही विशाळगडावर प्रकार झाला त्याचे समर्थन मी करणार नाही. पण झालेल्या घटनेला प्रशासन जबाबदार आहे. कारण 158 पैकी सात आणि सहा हे दोनच अतिक्रमण न्यायप्रविष्ठ आहेत. मग बाकीचे अतिक्रमण तुम्ही का काढले नाही?

अतिक्रमण काढण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता तर मग गेलं दीड वर्षात का काढलं नाही? स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाला हे प्रशासन बळी पडले आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. एक स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी विचार शिकवतो. शहागड चा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं? शाहू महाराजांचा पुरोगामित्व मला शिकवू नका.माझा जन्म त्यांच्या घराण्यात झाला आहे.

यासीन भटकळ सारखा अतिरेकी विशाळगडावर राहायला होता.अशी नोंद आहे.ज्या विशाळगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं स्वराज्य उभं केलं. या विशाळगडावर अशा पद्धतीचा गलिच्छ अतिक्रमण कसे करता? इकडून तिकडून पैसे खायचे आणि महायुतीत जायचे,आयुष्यभर शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी राहिले ते पुरोगामीत्व सोडून महायुतीसोबत जातात ते माझ्यावर बोलतात. अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तोफ डागली.

किल्ले विशाळगडावरील विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मी तर गेले दीड वर्षांपासून या प्रकरणात आलो आहे. प्रशासनाला माहीत होतं शिवभक्त येणार आहेत. मग त्यांनी अडीच निर्णय का दिला नाही. मी विशाळगडावर जाणार आहे माहित होतं, तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. शिवभक्तांचा आक्रोश होता हे प्रशासनाला माहीत होतं. मी तिथे येणार आहे हे देखील प्रशासनाला माहीत होतं मग प्रशासनाने बंदोबस्त का लावला नाही,असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

जुना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याचा धाडसी आदेश दिला होता.अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात झाली. मात्र ते पुन्हा थांबवण्यात आले ते कोणी थांबवलं? याचा शोध पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी घ्यावा. एक पुढारी नेता, आमदार,खासदार या गडकोट किल्ल्यांबद्दल काही बोलत नाही. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा वेळी सरकारने साडेतीनशे कोटी रुपये गडसंवर्धनासाठी जाहीर केले होते.ते पैसे कधी दिले, असा संतप्त सवाल संभाजी राजे छत्रपती यांनी केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT