Sushilkumar Shinde-Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : ‘मुख्यमंत्री असताना मोदी बरे होते; पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय गेलं माहिती नाही’

विश्वभूषण लिमये

Solapur, 19 March : मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा नरेंद्र मोदीही गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी मुख्यमंत्री होते, तोपर्यंत बरे होते. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय गेलं माहिती नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे आज मोहोळच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मागच्या 10 वर्षांत सरकारने भुलभुलैया केला आहे. सोलापूरला डाळी संशोधन केंद्र, सोलापूर जिल्ह्यासाठी वेगळं विद्यापीठ, एनटीपीसी, सोलापूर-पुणे-हैद्राबाद महामार्ग कोणी आणला. हे सर्व आपण आणलं आणि त्यांनी उद्घाटन केलं. मोदींची गॅरंटी ही कसली गॅरंटी आहे, माहिती नाही. हा देश गांधी नेहरू यांचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करमाळ्यातून 1971 मध्ये माझी पहिली निवडणूक होती, तेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो होतो. सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन आम्ही इथून निवडणूक लढलो आणि निवडून आलो. एकवेळ जनरल आणि एक वेळ राखीव सीटवर मी इथून 2 वेळा खासदार झालो. दलित समाजातला कार्यकर्ता जनरल सीटवर मोठ्या फरकाने निवडून येतो आणि तोच उमेदवार सीट राखीव झाल्यावर कसा पडतो, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिंदे म्हणाले, क्रांतीची ज्योत जेव्हा पेटते, तेव्हा तुम्ही सर्वजण मिळून साथ देता. मात्र, धार्मिक विचारसरणी जेव्हा येते आणि सर्वधर्म समभावाचा नाश होतो, म्हणून हे होतं. विश्वास नसणाऱ्या पक्षांवर आपण विसंबून राहिलो, तर आपली लोकशाही धोक्यात येईल आणि हुकूमशाहीचं वर्चस्व वाढेल. जर इथं हुकूमशहा आला तर रशियामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, त्यामुळे ही निवडणूक अतिशय सावधपणे लढली पाहिजे.

सोलापूर हे शहर हुतात्म्यांचं शहर आहे. देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून दिलं तर सोलापूरचा डंका दिल्लीत वाजेल. येणाऱ्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

...तेव्हा सोलापूरकरांची कॉलर टाइट व्हायची

अटलबिहारी वाजपेयी मला नेहमी म्हणायचे, ‘सुशीलकुमार शिंदे हे दलित आहेत. मात्र, लोकसभेला जनरल सीटवरून निवडून येतात. तेव्हा सोलापूरकरांची कॉलर टाइट व्हायची, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT