Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News: लबाडांना पवारांचे योगदान काय कळणार; जबाबदारीचे भान ठेऊन बोला...

Umesh Bambare-Patil

-रूपेश कदम

Maan News : लबाडी व फसवणूकीवर ज्यांची राजकीय कारकीर्द उभी आहे. स्वार्थासाठी ते काहीही करायला तयार असतात. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बाष्फळ बडबड करत खासदार शरद पवारांवर Sharad Pawar टीका करत आहेत. त्यांना खासदार पवारांचे योगदान काय कळणार, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख Prabhakar Deshmukh यांनी आमदार गोरे Jaykumar Gore यांना लगावला.

भिलार येथे भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेचा आज प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथे पत्रकार परिषदेत समाचार घेतला. प्रभाकर देशमुख म्हणाले, नेहमीप्रमाणे आमदार गोरे हे बरळताना खासदार शरद पवार यांच्यावर घसरले.

ज्या व्यक्तीने यशवंत नितीने चालताना संपुर्ण देशात आपल्या कार्य कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात हे नेहमी आंघोळीचा कार्यक्रम करतात, ते पाणी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे आले आहे हे त्यांनी विसरु नये. उरमोडी धरण बांधून पुर्ण झाल्यानंतर तीन-चार वर्षे ते पाणी धरणात तसेच पडून होते.

उरमोडी जोड कालव्यातून कण्हेर कालव्यामध्ये पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता. मी विभागीय आयुक्त असताना जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांना सोबत घेवून खासदार पवार यांची भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खासदार पवार यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना बोलवून उरमोडी जोड कालव्याच्या कामास संमती देण्यास सांगितले.

आमदार शिवेंद्रराजे यांनी ती संमती मिळवून दिल्यानंतर फक्त दोन महिन्यात जलसंपदा विभागाने तो कालवा पुर्ण केला व उरमोडीचे पाणी माण-खटाव मध्ये आले हि वस्तुस्थिती आहे. प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, गेली बारा वर्षे आमदार असताना टेंभूचे पाणी तुमच्या छाताडावरुन सांगलीला जात आहे. या काळात तुम्हाला टेंभूच्या पाण्याचा थेंब माण-खटाव मध्ये आणता आला नाही.

तुमचा स्वाभिमान त्यावेळी तुम्ही कुठे गहाण ठेवला होता? टेंभूच्या ८.५ टी.एम.सी. पाणी वाटपाबाबत खासदार पवार यांना मी व मुख्य अभियंता यांनी मुंबई येथे सविस्तर माहिती दिली. खासदार पवार यांनी पुढाकार घेवून तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून टेंभूचे अडीच टी.एम.सी. पाणी माण-खटावच्या ४८ गावांसाठी आरक्षित केले. योजनेच्या सर्व्हेचे आदेश दिले. त्यासाठी मी स्वतः शेतकर्‍यांना सोबत घेवून पाठपुरावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT