Shashikant Shinde, Ajit Pawar
Shashikant Shinde, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शशिकांत शिंदेंच्या पराभवात अजितदादांचे नाव का घेतले जाते : त्यांनीच दिले उत्तर

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेणे योग्य नाही. मी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांचाही लाडका आहे. तिघांनीही मला प्रेम दिले आहे. अजित पवारांनी उपहासातून बोललेल्या वक्तव्याचा आधार काही मंडळी घेत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी `सरकारनामा` शी बोलताना केला.

जिल्हा बॅंक निवडणूक, 2019 ची विधानसभा निवडणूक, शरद पवारांची गाजलेला पावसातील सभा यावर शिंदे यांनी मनमोकळी उत्तर दिले. बॅंकेच्या निकालावर बोलताना त्यांनी गर्भित इशारेही दिले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांना गरम, गार करण्याचे इशारे दिले होते.

या सर्व परिस्थितीत तुम्ही आता तुम्ही शांत झाला आहात का, या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, १९९९ पूर्वी मी आक्रमक होत पण, आता शांत झालो आहे. तुमचा जिल्हा बँकेतील निकाल महाराष्ट्रात गाजला. या पराभवाला अनेक नेते कारणीभूत ठरले. त्यामुळे या सर्वांना तुम्ही बघून घेऊ, असा हा इशारा दिला होता. तो नेमका कोणासाठी होता, या प्रश्नावर ते म्हणाले, ''मी सरळ राजकारणी आहे. मला कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नाही. पवार साहेबांनी राजकिय व्यासपीठ दिले. पक्षाने संधी दिली.

पण, 2019 ची विधानसभा निवडणूक ते आताची जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत राजकारण बघितले. त्यावर बोलणे गरजेचे होते. म्हणून मी व्यक्त झालो. एका बाजूला जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला माझ्या विरोधात तयारी करायची हे सर्व अनुभवलं. मुळात त्यांनी पहिलेच सांगितले असते तर मी त्यापध्दतीने तयारी केली असती, अशी भूमिका त्यांनी मांडली.

'विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावर आमच्या पाच आमदारांची बैठक झाली होती. जिल्हा बॅंकेवर जावळीतून मी दोनदा निवडून आलो आहे. त्यामुळे या तालुक्यातील सहकार क्षेत्र मी बघायचे, असे ठरले होते. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी सहकार्याचा शब्द दिला होता. पाचगणीच्या बैठकीवेळी माझ्याकडे ३२ मतदार होते. त्यानंतर एक तारखेच्या बैठकीवेळी २७ जण होते. पण, माझ्या विरोधात दुसरा कोणी अर्ज भरणार नव्हते. या आशेवर मी लोकांना जायला सांगितले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मला गाफिल ठेवले गेले. त्याचा परिणाम झाला. गाफिल ठेवणाऱ्यांनीच माझा विश्वासघात केला, असे त्यांनी सांगितले.

माझ्या विरोधातील जिल्हा बॅंकेचे उमेदवार रांजणे हे आपल्या शब्दाबाहेर नसल्याचे शिवेंद्रराजे सांगत होते. मात्र, त्यांनी भूमिका बदलली. आम्ही समजून सांगतो पण रांजणे ऐकत नाहीत असे त्यांनी म्हणण्यास सुरवात केली. पण शिवेंद्रराजे यांनी यापूर्वीचे सांगितले असते तर हे सर्व संपले असे समजून मी वाटचाल केली असती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. अजित पवारांचाही हात तुमचा बॅंकेतील पराभवात होता का, यावर ते म्हणाले की मोठ्या नेत्यांचे नाव घेतले की राजकारण सोपे होते. हीच रणनिती काहीजण वापरतात. अजित पवार परखड नेते आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने माझ्यावर सहाभूती दाखवली. पडल्यानंतरही मला आमदारकी दिली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत राजंणेंना अजितदादा उपाहासातून बोलले होते. तुझ्याकडे 35 मतदार आहेत, तर जा लढव तू, असे चिडून बोलले होते. मात्र त्या वाक्याचा उपयोग माझ्याविरोधात केला गेला. खरे तर खासदार उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे घेता वेळी कॉन्फरन्स कॉलवर कोण बोलले, याचा शोध घेतला तर माझ्या विरोधातील नेता कोण याचे उत्तर मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT