Dr. Dilip Yelgaonkar
Dr. Dilip Yelgaonkar facebook page
पश्चिम महाराष्ट्र

येळगावकरांनी सांगितले जिहे कटापूरसाठीचे भाजप नेत्यांचे योगदान...

अय्याज मुल्ला

वडूज : खटाव माण तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे- कटापूर योजनेतंर्गत कृष्णा नदीचे पाणी नेर धरणात सोडण्याची नुकतीच चाचणी झाली. या योजनेसाठी आपणासह अनेकांचे यथाशक्ती योगदान आहे. मात्र, जिहे कटापूरचे पाणी सातेवाडी तलावासह एनकूळ परिसरापर्यंत पोहोचेल तेव्हाच आपणास मनस्वी समाधान होईल, असे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर यांनी सांगितले. वडुज (ता. खटाव) येथील ओंकार मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. येळगावकर म्हणाले, निवृत्त अभियंता मंडळाने जिहे-कटापूर योजना तयार केली होती. तर दिवंगत कर्नल आर.डी. निकम व सहकाऱ्यांनी सैनिक संघटनेच्या माध्यमातून ही योजना शासनाकडे सादर केली होती. तद्‌नंतर राज्यात 1996 च्या दरम्यान युती शासन आल्यानंतर आपण स्वत: व्यक्तीगत लक्ष घालून योजनेच्या मंजूरीसाठी भाजपाचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे , तत्कालीन मंत्री (कै.) महादेव शिवणकर, एकनाथ खडसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

मंत्री शिवणकर यांच्या भेटी प्रसंगी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष (कै.) सुर्यभान वहाडणे - पाटील यांचेही योगदान लाभले होते. सर्वांच्या पाठपुराव्यानंतर 26 कोटी 90 लाख रूपयांची या योजनेसाठी मूळ मंजूरी मिळाली. त्यानंतर युती शासनाच्या काळात प्रत्यक्ष योजनेचे कामही सुरू झाले. मात्र, नंतरच्या काळात युतीची सत्ता जावून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्या सरकारने विदर्भ, मराठवाडा अनुशेषाचा मुद्दा उपस्थित करत या योजनेकडे कानाडोळा केला. त्यावेळी आपण स्वत: आमदार असताना जतचे आमदार सुरेश खाडे यांना घेऊन विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले होते.

याशिवाय वडूजला कार्यकर्त्यांचे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी सुमारे 50 हून अधिक कार्यकर्त्यांना कळंबा जेलचा तुरूगंवास भोगावा लागला होता. या सर्वांचा परिपाक म्हणून योजनेचे काम पुनःश्च सुरू झाले. त्यातही निधीसाठी केंद्रीय जलआयोग मंजूरीचा अडथळा होता. त्याकरीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तोडगा काढण्यास आपणास यश आले होते. पाठीमागील भाजपच्या सरकारमधील पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांनीही या योजनेला न्याय दिला. मागील दोन वर्षांत पुन्हा सरकार बदलल्याने जिहे-कठापूरची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली होती.

हे काम मार्गी लावण्यासाठी आपण तीन वेळा मंत्रालयात हेलपाटे मारले. ज्याप्रमाणे मायणी परिसराला आपण टेंभूचे पाणी मिळवून दिले. त्याच धर्तीवर सातेवाडी, पेडगाव तसेच एनकूळ, कणसेवाडी परिसराला पाणी देण्याचा आपला मानस आहे. या कामी आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनाही पडळ साखर कारखान्याच्या कार्यक्रमात भेटलो होतो. मात्र, त्यांनी या विषयासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांच्याशी बैठक करण्याचा सल्ला दिला.

मंत्री जयंत पाटील यांना आपण या संदर्भात अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते या विषयावर टाळाटाळ करत असल्याचे जाणवले. त्यामुळे माझ्या मते सांगली जिल्ह्याचे हित जोपासणारे जयंत पाटील हेच दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नातील खरा अडथळा आहेत. कितीही अडचणी आल्या तरी जिहे कठापूर योजना परिपूर्ण होण्यासाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबरच पुन्हा एकदा खटाव माण तालुक्यातील जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT