Amaravati Sarkarnama
महाराष्ट्र

Amaravati : पोलिस ठाण्यावर जमावाची तुफान दगडफेक; 29 कर्मचारी जखमी, पोलिस व्हॅन, दुचाकी फोडल्या

Pradeep Pendhare

Amravati News : अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत 29 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने तुफान दगडफेकीमुळे पोलिस ठाण्याचे मोठं नुकसान झालं. पोलिस ठाण्यात दगडांचा खच पडला होता. या दगडफेकीमुळे पोलिसांच्या वाहनांचे देखील नुकसान झाले.

पोलिस व्हॅन, दुचाकी जमावाने फोडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपुरी गेट पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या असून, हद्दीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील दासनादेवी मंदिराचे विश्वस्त स्वामी यती नरसिंह आनंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्री 500 ते 700 लोकांचा जमाव नागपुरी गेट पोलिस (Police) ठाण्याबाहेर जमा झाला होता. गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावाने लावून धरली होती. यावरून पोलिसांशी त्यांचा वाद झाला. दोन्ही बाजूने प्रकरण चिघळल्यानंतर, जमावाने संतप्त होत पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरू केली. जमावाने दगडफेकीबरोबर पोलिस व्हॅन, दुचाकींचे देखील नुकसान केले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे बेसावध असलेल्या पोलिसांनी प्रतिकार करण्याची संधी देखील मिळाली नाही. यात 29 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

पोलिस ठाणे आणि परिसरात जमावाने केलेल्या दगडांचा खच पडला होता. जमाव शांत बसत नसल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमाव काहीसा पांगला. पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि सागर पाटील यांनी नागपुरी गेट पोलिस ठाण्याकडे अतिरीक्त पोलिस कुमूक घेत धाव घेतली. तोपर्यंत जमाव पांगला होता. जखमी पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती तणावाची आहे. पोलिस ठाण्याची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, जमावातील दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचा आदेश दिला आहे.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे ट्रस्टी यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमाव पोलिस ठाण्याबाहेर जमला होता. यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी 29 सप्टेंबरला गाजियाबाद इथं बोलताना विशिष्ट धर्मियांविरोधात आक्षेपार्ह टिपणी केली होती. त्यावरून जमाव संतप्त होता. यती नरसिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना जमावाची पोलिसांबरोबर वाद झाला आणि दगडफेक झाली. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी देखील ताणावाची स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT