Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे अन् महायुतीची 'हॉटेल ताज लँड्स'मधील बोलणी फिस्कटली?

सरकारनामा ब्यूरो

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मंगळवार मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका जाहीर केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र राज ठाकरेंनी हेही सांगितले की ते त्यांना कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटीत सर नव्हता. शिवाय, राज्यसभा आणि विधानपरिषदेचीही जागा आपल्याला नको, असं त्यांनी सांगितलं.

मात्र तत्पूर्वी राज ठाकरेंचा(Raj Thackeray) महायुतीमधील प्रवेशाची चर्चा नेमकी कशामुळे फिस्कटली याबाबत सध्या माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार धनुष्यबाण चिन्हामुळे मनसे सोबतची चर्चा फिस्टकल्याचं बोललं जात आहे.

कारण, अमित शाह यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली होती पण मुंबईतील बैठकीत राज ठाकरेंना धनुष्य बाण चिन्हावर लोकसभा लढवण्याचा प्रस्ताव दिला गेला होता, पण राज ठाकरे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच म्हणजेच रेल्वे इंजिनावर लढवण्यास आग्रही होते, त्यामुळे महायुतीत जाण्याची चर्चा फिस्टकली, अशी माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनीही अगोदरच स्पष्ट केलं होतं की, मनसेच्या उमेदवारांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा कुठलाही प्रस्ताव राज ठाकरेंना दिला गेला नव्हता.

याचबरोबर दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई हे दोन मतदारसंघ मनसेला दिले जाणार होते, मात्र धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दर्शवला. 21 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात ताज लॅण्ड हॉटेल मध्ये बैठक झाली होती. तेव्हा मनसेकडून बाळा नांदगाकर आणि शालिनी ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार होती, असंही सांगितलं जात आहे.

दरम्यान गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी, 'माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा पेरल्या... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. माझ्या पक्षाच्या चिन्हावर कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.' असंही स्पष्ट केलं.

याशिवाय वृत्तपत्रातून शिवसेनेत मनसे(MNS) विलीन करण्याच्या ज्या काही बातम्या आल्या त्या खोट्या असल्याचे राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळव्यात सांगितले. ते म्हणाले, शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असते तर मी सुरुवातीलाच झालो असतो. त्यावेळी माझ्याकडे जवळपास ३२ आमदार, सहा-सात खासदार होते. त्यांनी आपण एकत्र बाहेर पडू असे सांगितले होते.

त्यावेळी मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. उद्या काय करायचे झाले तर स्वतःचा पक्ष काढेन. ती माझ्या मनाशीच खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब सोडून मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्ष फोडून नाही तर स्वतःच्या पक्ष काढून राजकारण करणार असल्याचे ठरवले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT